Join us  

तीन नव्हे, सहा दिवस मुसळधार पावसाचे - हवामान खात्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:08 AM

पुढील सहा दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. शुक्रवार ७ जून ते सोमवार ११ जून या कालावधीत राज्यात विशेषत: कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे.

मुंबई : पुढील सहा दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. शुक्रवार ७ जून ते सोमवार ११ जून या कालावधीत राज्यात विशेषत: कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती निवारण कक्षाने केले आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ७ जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवार, ८ जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असून, वर्तविण्यात आली आहे.शनिवार, ९ जून रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. १० व ११ जून रोजी मुंबईसह कोकणात सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानंतर, राज्य आपत्ती निवारण कक्षाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्व जिल्ह्यातील प्रशासनास सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील सहा दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थितीचा आढावा घेतला. राज्यातील विशेषत: कोकण भागातील जिल्हा प्रशासनास सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले. आपत्कालीन यंत्रणा तयार ठेवून अशा परिस्थितीत योग्य ती दक्षता घेण्याच्या व नागरिकांना सहकार्य करण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :पाऊस