हिंदू नेते, पत्रकार यांची हत्या करून देशात अशांतता माजवण्याचा होता कट
लष्कर-ए-तोयबाच्या तीन अतिरेक्यांना १० वर्षे कारावासाची शिक्षा
हिंदू नेते, पत्रकार यांची हत्या करून देशात अशांतता माजवण्याचा होता कट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हिंदू नेते व पत्रकारांची हत्या करून देशात अशांतता निर्माण करण्याचा कट रचल्याप्रकरणी २०१२ मध्ये नांदेडमधून अटक केलेल्या तीन अतिरेक्यांना विशेष एनआयए न्यायालयाने दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
न्या. डी. इ. कोठलीकर यांनी अन्य दोन आरोपींची पुराव्याअभावी सुटका केली. महाराष्ट्र एटीएसने २०१२ मध्ये पाच आरोपींना नांदेडमधून अटक केली. त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे वर्ग केले. मंगळवारी न्यायालयाने मोहम्मद अक्रम, मोहम्मद मुझम्मील आणि मोहम्मद सादिक यांना यूएपीए, शस्त्रास्त्रे कायद्याअंतर्गत दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. तर मोहम्मद इरफान आणि मोहम्मद इलियास यांची पुराव्याअभावी सुटका केली.
एनआयएच्या म्हणण्यानुसार, अक्रम हा सौदी अरेबियात नोकरी मिळवण्यासाठी गेला होता. तिथे वास्तव्यादरम्यान त्याची ओळख पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांशी झाली. नांदेड, हैदराबाद, बंगळुरू अशा देशातील महत्त्वाच्या ठिकाणचे हिंदू नेते, पत्रकार आणि पोलीस अधिकाऱ्यांची हत्या करून देशात अशांतता निर्माण करण्याचा कट या सर्व आरोपींनी सौदी अरेबियात केला होता. मात्र, कट अंमलात आणण्यापूर्वीच एटीएसने त्यांना २०१२ मध्ये नांदेडमधून अटक केली.
....................................................................