अमोल पाटील, खालापूरअवकाळी पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच रडवले आहे. वादळी पावसात आंबा फळपिकासह सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. राज्य शासनाकडून नुकसानभरपाई देण्याचे सूतोवाच करण्यात आल्यानंतर आता पंचानाम्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून एकट्या खालापूर तालुक्यात तीनशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसाने खालापूर तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. यात सर्वाधिक फटका आंबा पिकाला बसला असून काजू , चिकू, नारळ ही फळपिके देखील धोक्यात आली आहेत. भाजीपाला, कडधान्याचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. गेल्यावर्षीही अवेळी पावसाने आंबा पिकावर परिणाम केला होता. हवामान बदलाचा फटका हंगामी पिकांना होत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कृषी विभागाने तातडीने पंचनामे तयार करून आर्थिक नुकसान भरपाईचे वाटप करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशाने सर्वत्र पंचनामे सुरु झाले असून तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्यावर पंचनाम्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तीनशे एकरवरील पीक धोक्यात
By admin | Updated: March 12, 2015 22:38 IST