Join us

भवानी ज्वेलर्स दरोड्यातील तीन आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : अंबरनाथच्या चिखलोली परिसरात भरदिवसा बंदुकीच्या मदतीने सशस्त्र दरोडा टाकून २५ तोळे सोने लुटणाऱ्या टोळीतीळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : अंबरनाथच्या चिखलोली परिसरात भरदिवसा बंदुकीच्या मदतीने सशस्त्र दरोडा टाकून २५ तोळे सोने लुटणाऱ्या टोळीतीळ तिघांच्या मुसक्या आवळण्यात अंबरनाथ पोलिसांना यश आले आहे. मोनू विश्वकर्मा, दिवेश सिंग आणि धीरज सर्वगोडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून २५ पैकी पाच तोळे सोने जप्त करण्यात आले असून, या घटनेतील मुख्य सूत्रधार आणि आणखी एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

चिखलोली परिसरात १० जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास चार अनोळखी व्यक्तींनी भवानी ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा टाकला. या वेळी हल्लेखोरांनी गोळीबार आणि चाकूने हल्ला करीत दुकानातील तिघांना जखमी केले होते. यात २० ते २५ तोळे सोने चोरट्यांनी लुटून पोबारा केला होता. दिवसाढवळ्या घडलेल्या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने अंबरनाथ पोलिसांनी दहा दिवसांपूर्वी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली होती. त्यानंतर चार दिवसांनी आणखी एकाला तर पाच दिवसांपूर्वी तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

आरोपींमधील धीरज सर्वगोडे हा कोल्हापूरचा रहिवासी असून इतर दोघे आंबिवली येथील रहिवासी आहेत, अशी माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली. या आरोपींकडून पाच तोळे सोने परत मिळवण्यात पोलिसांना यश आले. या घटनेतील मुख्य सूत्रधार हरिश सिंग आणि दिव्यांश सत्येंद्र भदोरिया हे अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.