पनवेल : रायगड जिल्हा गावकीची दहशत व वाळीत प्रकरणे सध्या राज्याच्या नकाशावर चुकीच्या पद्धतीने झळकत आहे. याबाबत वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई, बैठका घेऊनही याला आवर बसण्याऐवजी या प्रकरणांत वाढच होत आहे. वाळीत प्रकरणांचा फटका पनवेलमधील तारा गावातील लक्ष्मण ठाकूर या आरटीआयच्या कार्यकर्त्यालाही बसला. कर्नाळ्याजवळील तारा गावातील इसमाने वनजमिनीवरील अनधिकृत बांधकामाची माहिती मिळविण्याकरिता माहिती अधिकाराखाली केलेला अर्ज गावकीने अयोग्य ठरवत उलट त्यांनाच साडेसात हजाराचा दंड ठोठावला. अलिबाग, मुरूड, म्हसळा, महाड, तळा, माणगाव, रोहा तालुक्यात अनेक वाळीत टाकण्याचा घटना घडलेल्या आहेत. गावकी, पंच कमिटी त्याचबरोबर मंडळाच्या दहशतीखाली लोक वावरत असून त्यांच्या मनमानीला आवर घालण्यास प्रशासनालाही अपयश येत आहे. गावातील लक्ष्मण या आरटीआय कार्यकर्त्याने तारा व बांधनवाडी या गावच्या वनजमिनीवर किती बांधकामे आहेत, याची माहिती मिळावी याकरिता चार महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. कार्यालयातून अशा प्रकारे अर्ज आल्याची माहिती गावकीला कळली. अर्जदाराने गावकीला विचारात न घेता हा अर्ज केल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशीच गावकीची बैठक होऊन अर्जदाराला ५ हजार, त्याचबरोबर गावकीचे ऐकत नसल्याने अडीच हजार असा एकूण साडेसात हजारांचा दंड सुनावला. (वार्ताहर)गावावर दहशत४तारा गावावर गावकीचा पगडा असून या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत पंच कमिटी दखल घेते. गावाला विचारल्याशिवाय काहीही न करण्याचा दंडक घालून दिला आहे. कुठे अर्ज किंवा माहिती मागायची असेल तर पहिला हा प्रस्ताव कमिटीसमोर ठेवायचा, मान्यता मिळाली की अर्ज करायचा असा सर्व प्रकार या ठिकाणी चालतो. गावातील एकही तक्रार पोलीस ठाण्यात जाऊन दिलेली नाही.
माहिती मागितल्याने ठोठावला दंड
By admin | Updated: April 14, 2015 22:40 IST