मुंबई : गेल्या काही वर्षांपासून तळीराम चालकांना चाप लावण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून केले जात आहेत. यात दंडात्मक कारवाईबरोबरच चालकांचे लायसन्स निलंबित केले जात आहे. मात्र तळीराम चालकांना कायद्याचा धाक राहिलेला नसून, या चालकांचा मुंबईत धुमाकूळ सुरूच आहे. गेल्या साडेसात वर्षांत (२००८ ते २0१५) तब्बल ४३ हजार ७९७ तळीराम चालकांचे लायसन्स निलंबित करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल २५ कोटी २८ लाख ७४ रुपये दंडात्मक कारवाईतून वाहतूक पोलीस विभागाला मिळाले आहेत. गेल्या काही वर्षांत तळीराम चालकांमुळे अनेक अपघात मुंबईतील रस्त्यांवर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यात अनेकांचा बळी जात असून, तळीराम चालकांविरोधात कठोर कारवाई होताना दिसत नाही. नुकत्याच मुंबईतील फ्री वेवर एका महिला वकिलाच्या गाडीने दोन जणांचा बळी घेतल्याची घटना घडली. यात ही महिला दारू पिऊन वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुन्हा एकदा तळीराम चालकांविरोधात होत असलेल्या कारवाईचा मुद्दा पुढे आला. गेल्या साडेसात वर्षांत तळीराम चालकांची संख्या कमी-कमी होत चालली असून वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम, जनजागृती आणि कठोर कारवाई सुरू केल्यानेच ही संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येते. साडेसात वर्षांत एकूण दारू पिऊन वाहन चालविण्याच्या १ लाख १0 हजार ४१६ केसेस दाखल झाल्या असून, यात ४३ हजार ७९७ चालकांचे लायसन्स न्यायालयाकडून निलंबित करण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आठ वर्षांत एकूण २५ कोटी २८ लाख ७४ हजार ४५0 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत ५४ हजार १५0 तळीराम चालकांना तुरुंगवास भोगावा लागला असून, २0१५ मधील ६ हजार ८२२ चालकांचा समावेश आहे.