नामदेव मोरे, नवी मुंबईशहरात धोकादायक इमारतींमध्ये राहणारे हजारो नागरिक मृत्यूच्या छायेत जगत आहेत. कोणत्याही क्षणी इमारती कोसळण्याची शक्यता असून महापालिका प्रशासन मात्र या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. पावसाळा सुरू झाला तरी धोकादायक वास्तूंची यादीच प्रसिद्ध केली नसून विभाग कार्यालयांनी वेळेत सर्वेक्षण न केल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने धोकादायक इमारतींची यादी घोषित करणे आवश्यक असते. प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात यादी प्रसिद्ध केली जाते. परंतु शहरात धोकादायक बांधकामांचे सर्वेक्षणच केले जात नाही. मागील वर्षीची यादीच पुन्हा छापण्याची प्रथा पडली आहे. यामुळे महापालिकेच्या विभाग कार्यालय व अभियांत्रिकी विभागाकडून वास्तव सर्वेक्षण केले जात नाही. जून महिन्याचा दुसरा आठवडा संपला तरी धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आलेली नाही. नागरिकांमध्येही संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता विभाग कार्यालयांमधील अनागोंदी कारभारामुळेच या प्रक्रियेला विलंब झाला असल्याची माहिती निदर्शनास आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे विभाग अधिकाऱ्यांनी स्वत:च्या सहींनी धोकादायक इमारतींची यादी पुढील कार्यवाहीसाठी पाठवून देण्यात आली होती. परंतु विभाग अधिकाऱ्यांना एखादी वास्तू धोकादायक ठरविण्याचा किंवा त्याविषयी अहवाल देण्याचा अधिकारच नाही. त्यांना याविषयी तांत्रिक ज्ञान नसते. वास्तविक त्या विभागातील अभियंत्यांनी सर्वेक्षण करून अहवाल देणे अपेक्षित आहे. धोकादायक इमारतींची विभाग अधिकाऱ्यांनी दिलेली यादी रद्द करून पुन्हा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे धोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यास विलंब झाला आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत सदर बांधकामांची यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. वाशी, नेरूळ, सीवूड व इतर अनेक ठिकाणी हजारो नागरिक धोकादायक इमारतींमध्ये रहात आहेत. कोणत्याही क्षणी इमारती कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिक जीव मुठीत धरून पावसाळ्यात इमारतींमध्ये रहात आहेत. परंतु महापालिका प्रशासनास या समस्येचे गांभीर्यच उरलेले नाही. औपचारिकता म्हणून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जात आहे. यामध्ये जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त होत आहे. संक्रमण शिबिर : नवी मुंबईमधील धोकादायक इमारतींची संख्या वाढत आहे. कोणत्याही क्षणी इमारती कोसळून जीवित व वित्तहानी होवू शकते. दुर्घटना घडल्यास नागरिकांच्या पुनर्वसनासाठी शहरात संक्रमण शिबिरे नाहीत. महापालिका अर्थसंकल्पामध्ये संक्रमण शिबिर उभारण्यासाठी तरतूद करते. परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास नागरिकांना महापालिका शाळा व समाजमंदिरांचा आसरा घ्यावा लागणार आहे. वाशीत इमारतीचा स्लॅब कोसळला- शहरात सर्वाधिक धोकादायक इमारती वाशीमध्ये आहेत. सोमवारी सेक्टर १० मधील जेएन २ श्रद्धा अपार्टमेंट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचा भाग तळमजल्यावरील घरावर पडला. घरावरील पत्रा तुटून सिमेंटचे तुकडे घरामध्ये पडले. घरात कोणीच नसल्यामुळे जीवितहानी टळली. पावसाळा सुरू होताच इमारतीचे स्लॅब कोसळू लागल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. - अशीच स्थिती राहिली तर या पावसाळ्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येथील रहिवासी महेश परब यांनी सांगितले की, आमच्या शेजारच्या इमारतीमध्ये ही घटना घडली. अपघातामुळे नागरिक घाबरले आहेत. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. नगरसेवक किशोर पाटकर व इतरांनी भेट देवून पाहणी केल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाने गांभीर्याने या समस्येकडे पाहावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
मृत्यूच्या छायेत जगताहेत हजारो रहिवासी
By admin | Updated: June 16, 2015 01:04 IST