Join us  

मंत्रिपदात रस नाही, एक सामान्य कार्यकर्ता म्हणूनच कार्यरत राहणार- गोपाळ शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 7:27 PM

लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाल लागण्यासाठी काही तासच राहिले आहेत.

- मनोहर कुंभेजकरमुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाल लागण्यासाठी काही तासच राहिले आहेत. देशभरातील विविध प्रसिद्धी माध्यमात सुरू असलेल्या एक्झिट पोलमध्येही काही अंशी चित्र स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर मुंबई महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी "मला मंंत्रिपदात स्वारस्य नाही, तर एक सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणूनच कार्यरत राहणार", असे व्यक्तव्य त्यांनी आज सकाळी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.

उत्तर मुंबईत महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी विरुद्ध काँग्रेसच्या ऊर्मिला मातोंडकर अशी मुख्य लढत आहे. मी निवडणुकीचे अजिबात टेन्शन घेतले नाही, तर महायुतीच्या सर्व पदाधिकारी व नेत्यांनी माझ्यासाठी अहोरात्र मेहनत केली. उत्तर मुंबईच्या मतदारांनी आपल्यावर व महायुतीवर दाखवलेल्या दृढ विश्वासामुळे यंदा देखील मोठ्या मताधिक्क्याने आपण  विजयी होऊ, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्या सकाळी 8 वाजता मतपेटी उघडणार आणि  मुंबईतील सर्व ६ जागांवर कमळ खुलणार का याचं मतमोजणीनंतर एकूणच चित्र स्पष्ट होणार आहे. विरोधकांबद्दल बोलताना ते म्हणाले की,  “ही निवडणूक म्हणजे लढाई आहे, या लढाईमध्ये जो भाग घेईल त्याचा निकाल मतपेटीतून स्पष्ट होतो. मी चांगले काम केले आहे आणि जो चांगले काम करतो त्याला जनता कायम पाठिंबा देते. ईव्हीएम मशिन्स बद्दल विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्याबद्दल शेट्टी म्हणाले, " निवडणुकीत ईव्हीएम मशिन्सद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणली नाही.ती काँग्रेस सरकारने आणली होती. तेच जर याबद्दल प्रश्न उपस्थित करत असतील तर कसं होणार ? आज आपण डिजिटल इंडियाची चर्चा करत आहोत. देशामध्ये बदल होत आहे,जर काँग्रेस पक्ष असा विचार करत असेल तर मला वाटतं की आपण २१ व्या नव्हे तर ते १८ व्या शतकामध्ये जगात आहेत. भारतीय लोकशाही ही सगळ्यात मजबूत लोकशाही आहे याचे श्रेय मी सर्वसामान्य जनतेला देतो. लोकशाहीला बळकट करण्याचे काम जनतेला जाते. हे येणा-या काही दिवसांत स्पष्ट होईल."

शेट्टींनी २६ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९२मध्ये बृहन्मुंबई महापालिका निवडणूक जिंकली होती. त्यांनी तब्बल ३ वेळा नगरसेवक पद भूषविले आहे. त्यानंतर सतत दोन वेळा ते बोरिवली मतदारसंघातून आमदार राहिले होते. २०१४ मध्ये गोपाळ शेट्टी यांना उत्तर मुंबईतून लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आणि त्या निवडणूकीत त्यांना ६ लाख ६४ हजार ४ मते त्यांना मिळाली होती.त्यांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा 4 लाख 46 मतांनी पराभव केला होता.आणि 2014 साली ते महाराष्ट्रातून सर्वात जास्त मताधिक्याने विजयी होणा-या खासदारांच्या पंक्तीत येऊन विराजमान झाले होते.

टॅग्स :गोपाळ शेट्टीमुंबई उत्तरलोकसभा निवडणूक २०१९