Join us

इच्छुकांसाठी उमेदवारीच्या एक ना अनेक संधी

By admin | Updated: March 10, 2015 00:33 IST

पुढील तीन -चार दिवसांत महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांसह विविध छोटे

कमलाकर कांबळे. नवी मुंबईपुढील तीन -चार दिवसांत महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांसह विविध छोटे पक्षही तयारीला लागले आहेत. एकूणच यावेळी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांसाठी उमेदवारीसाठी अनेक पर्याय खुले असणार आहेत. त्यानुसार प्रमुख राजकीय पक्षांतील असंतुष्टांना गळाला लावण्याच्या दृष्टीने छोट्या पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर सायबर सिटीतील राजकीय समीकरणे बदलली.यामुळे महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक अधिक रंजक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातच सत्तेसाठी खरी चुरस असेल, असे एकूणच निवडणूकपूर्व चित्र आहे. बदललेल्या राजकीय समीकरणाचा फायदा उचलण्यासाठी जुने आणि नव्याने स्थापन झालेले अनेक छोटे- छोटे पक्षही तयारीला लागले आहेत. यात विशेषत: शिवसंग्राम, रिपब्लिकन सेना, भारिप बहुजन महासंघ,राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रीय अंत्योदय काँग्रेस पक्ष, शिव सुराज्य परिवर्तन सेना, मनसे, रिपाइं व शेकाप आदींचा समावेश आहे. यापैकी शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपाइं हे महायुतीचे घटक पक्ष आहेत. मात्र महायुतीचे प्रमुख घटक असलेले शिवसेना आणि भाजपा हे दोन पक्ष स्वबळावर निवडणुका लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे छोट्या घटक पक्षांची पंचाईत होणार आहे. अशा परिस्थितीत समविचारी पक्ष आणि संघटनांनी एकत्रित येऊन या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या एका पर्यायी विचारावर सध्या मंथन सुरू आहे. दरम्यान,या निवडणुकीत काही ठरावीक प्रभागात उमेदवार उभे करण्याची योजना असून लवकरच अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल, असे अंत्योदय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष अजय कांबळे यांनी स्पष्ट केले. तर या निवडणुकीत अधिकाधिक सुशिक्षित व होतकरू तरुणांना संधी देण्याची आपली योजना असल्याचे शिवसुराज्य सेनेचे नितीन कामत यांनी म्हटले आहे.राष्ट्रवादी व काँग्रेसमधील असंतुष्टांना फोडण्याचा धडाका शिवसेनेने लावला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या सेनेतील निष्ठावंत अस्वस्थ झाले आहेत. परिणामी, ऐन निवडणुकीत आतले आणि बाहेरचे हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. ही बाब संभाव्य बंडखोरीला खतपाणी घालणारी असल्याचे मत सेनेतील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केले. भाजपाची परिस्थिती नेमकी उलट आहे. महापालिकेतील सत्ताकेंद्र खेचून आणण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी जोरदार व्यूहरचना आखली आहे. मात्र स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची फळी नसल्याने कसरत होत आहे. त्यातुलनेत काँग्रेसची डोकेदुखी खूपच कमी झाली. प्रथम येईल त्याला उमेदवारी या तत्त्वावर काँग्रेसला आपल्या १११ उमेदवारांचा कोटा पूर्ण करता येणार आहे. एकूणच यावेळी उमेदवारीसाठी विविध पर्याय उपलब्ध झाल्याने इच्छुकांना यंदा संधी मिळणार आहे.