ठाणे : ठाण्याच्या मेट्रोला मंजुरी मिळावी, यासाठी मागील पाच वर्षे प्रयत्न सुरू असतानादेखील अद्यापही त्याबाबत शासन अनुकूल होत नसल्याने अखेर आता आमदार प्रताप सरनाईक यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. येत्या अधिवेशन काळात पहिल्या आठवड्यात या प्रकल्पाला मंजुरी मिळाली नाहीतर नाइलाजास्तव विधानभवनाच्या पायऱ्यांवर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे देऊन घरचा आहेर दिला आहे. मुंबईतील गर्दीचा ताण ठाण्यावर पडत आहे. रेल्वेची उपनगरी सेवा वगळता प्रचंड संख्येने रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे इतर शहरांबरोबरच शासनाने ठाण्यातील मेट्रो सेवेलाही प्राधान्य देणे आवश्यक असतानादेखील ठाणे मेट्रो वडाळा-कासारवडवली प्रकल्पास मंजुरी देण्यात आली नाही, ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. कासारवडवली येथील कारशेडचा प्रश्नही मार्गी लागला आहे. आता या प्रकल्पालाही मंजुरी मिळेल, अशी आशा होती. परंतु, तीही फोल ठरल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
तर ठाणे मेट्रोसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उपोषण
By admin | Updated: July 15, 2015 23:16 IST