कल्याण : यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ८ नगरसेवक उतरले होते. यातील काहींना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाली होती़, तर काहींना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष किंवा अन्य राजकीय पक्षांमध्ये उडी मारून बंडाचे निशाण फडकवले होते. परंतु, निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्यांचे ‘आमदार’ होण्याचे स्वप्न भंगले आहे. केडीएमसीच्या विद्यमान ११ नगरसेवक ांनी या वेळच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करून आपली राजकीय इच्छाशक्ती दांडगी असल्याचे सिद्ध केले होते. परंतु, यातील बंडखोरी केलेल्या ३ नगरसेवकांनी माघार घेतली. यामुळे सचिन पोटे (काँग्रेस), दीपेश म्हात्रे (शिवसेना), नितीन निकम (मनसे), संजय पाटील, विकास म्हात्रे, निलेश शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यासह बंडखोरी केलेले आयुब कुरेशी (अपक्ष) आणि विशाल पावशे (भाजपा) हे ८ नगरसेवक रिंगणात होते. रविवारी झालेल्या मतमोजणीत या नगरसेवकांच्या पदरी पराभव पडला आहे. काँग्रेसचे पोटे, राष्ट्रवादीचे पाटील यांच्यासह अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले कुरेशी या तिघांना कल्याण पश्चिम मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले. कल्याण पूर्व मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिलेले मनसेचे निकम, राष्ट्रवादीचे शिंदे आणि भाजपाचे पावशे, तर डोंबिवली मतदारसंघात शिवसेनेचे दीपेश म्हात्रे आणि राष्ट्रवादीचे विकास म्हात्रे यांचा पराभव झाला आहे. (प्रतिनिधी)
‘त्यांचे’आमदारकीचे स्वप्न भंगले
By admin | Updated: October 21, 2014 01:56 IST