घोडबंदर : मुलांच्या जन्माच्या वेळी मेंदूतील काही पेशींना दुखापत झाल्यास मेंदूचा पक्षाघात (सेरेब्रल पाल्सी) होतो. मुलांची वाढ व शब्दोच्चार खुंटतात. शरीराच्या हालचाली काही प्रमाणात मंदावतात. नीता व राजीव देवळालकर यांची मुलगी अशीच बहुविकलांग जन्मली. त्या मुलीच्या पालनपोषणासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेत त्यांनी जुलै २००५ मध्ये शहरातील बहुविकलांग मुलांच्या पुनर्वसनासाठी ठाण्यात ‘स्वयं’ नावाची संस्था सुरू केली. ही संस्थाही आर्थिक विवंचनेत सापडली आहे. यावर उपाय म्हणून ठाणे महापालिकेने कौशल्या मेडिकल फाउंडेशन येथे असलेली स्वत:ची १२ हजार २०० स्क्वेअर फुटांची जागा जॉइंट व्हेंचर म्हणून संस्थेला ११ वर्षांसाठी दिली आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक मुलांनी या केंद्राचा लाभ घेतला. त्यामुळे यातील अनेक मुले धावू लागली. स्वत:चे काम स्वत: करू लागली, हे संस्थेचे यश असल्याचे देवळालकर यांनी सांगितले.या संस्थेत बहुविकलांग मुले व त्यांचे पालक यांच्यासाठी प्रशिक्षण व समुपदेशन दिले जाते. न्यूरोडेव्हलपमेंटल, सेन्सरी इंटिग्रेशन, स्पीच, आॅक्युपेशनल ग्रुप थेरपी अल्पशा फीमध्ये केले जाते. सामूहिक खेळ, वेशभूषा, वाढदिवस, दिवाळी, दसरा हे सणदेखील साजरे होतात. मुलांमधील प्रगतीची वेळोवेळी चाचणी आणि तपासणी केली जाते. अल्पशा मानधनावर काही डॉक्टर या कार्याला हातभार लावत आहेत.तर या संस्थेत येणाऱ्या मुलांची संख्या आणि त्यांचा खर्च वाढत चालल्याने आर्थिक मदतीसाठी संस्थेची धावाधाव सुरू आहे. कार्याचा विस्तार होत असल्याने भविष्यात या मुलांसाठी शेल्टर होम उभे करण्याचा मानस आहे. (वार्ताहर)
बहुविकलांगांसाठी ठाणे मनपाचे जॉइंट व्हेंचर
By admin | Updated: July 13, 2014 23:32 IST