ठाणे : शहरासह जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही पावसाने संततधार हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी ३३.८६ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. इतर तालुक्यांच्या पेक्षा ठाणे तालुक्यात सर्वाधिक ६८.८० मिमि पाऊस पडला आहे.तर भिवंडीतील नारपोली गावाच्या टेकडीवर वसलेल्या साठे नगरातील चार घरांची भिंत कोसळून तीन कुटूंबे बेघर झाले असून तिघे जखमी झाले आहेत. विशेष म्हणेज रविवार असल्याने चाकरमान्यांनी घरीच राहणे पसंत केले. शहरात रविवारी सकाळपर्यंत ९५ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण ६११ मिमी इतक्या पावसाची नोंद झाल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.तसेच पालिक आयुक्तांनी शहरातील विविध ठिकाणी पाहणी दौरा केला. जिल्ह्यात एकूण २३७.०० मिमि पाऊस मागील चोवीस तासात झाला आहे. ठाण्यात ६८.८०, कल्याण ३९.००, मुरबाड-१२.००. उल्हासनगर ४२.००,अंबरनाथ २३.२०, भिवंडी ३५.०० आणि शहापूर १७.०० मिमि असा सरासरी जिल्ह्यात ३३.८६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात शहरात एकूण ९५ मिमि इतका पाऊस पडला आहे. या दरम्यान, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे एकूण २४ तक्रारी दाखल झाल्या होत्या. यामध्ये झाडे पडल्याच्या ४, फांद्या पडण्याच्या ७, भिंत पडण्याच्या एक तर इतर १२ प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. तसेच या वर्षी २१ जून पर्यंत ६११ मिमि इतक्या पावसाची नोंद झाली.
ठाणे जिल्ह्यात रविवारीही पावसाची संततधार सुरुच
By admin | Updated: June 22, 2015 02:03 IST