ठाणे : २००९च्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातल्या ज्या तीनही मतदारसंघांत मतदारांनी ज्या महायुतीला चारीमुंड्या चीत केले होते व एकट्या कल्याणवर शिवसेनेचा झेंडा फडकावला होता, त्याच ठाणे जिल्ह्यातील मतदारांनी कल्याणवरील शिवसेनेचा झेंडा कायम ठेवून ठाणे, भिवंडी, पालघर या तीनही मतदारसंघांत आघाडीचे पानिपत घडविले. काँग्रेस-राष्ट्रवादीने आपले चार मतदारसंघ राखण्यासाठी अनेक कोलांट्या उड्या मारल्या. ठाण्यात नाईक कुटुंबातील संजीव नाईक यांना पुन्हा उमेदवारी दिली. सेनेतील नाराज आनंद परांजपेंना राष्ट्रवादीने आपल्या पंखाखाली घेतले, तर काँग्रेसने भिवंडीत विद्यमान खासदार सुरेश टावरे यांना नाकारून कुणबी सेनेच्या विश्वनाथ जाधवांना आपल्या वळचणीला बांधून उमेदवारी बहाल केली. पालघरमध्ये आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांना उमेदवारी देऊन ते निवडून येणार नाहीत असा अहवाल गुप्तचरांनी देताच त्यांना माघार घ्यायला लावून बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधवांना पाठिंबा दिला. परंतु, मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना चारही मतदारसंघांत बहुमतांनी विजयी केले. ठाण्यात आघाडीचे उमेदवार डॉ. संजीव नाईक यांचा सेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी अत्यंत दारुण पराभव केला. ही निवडणूक संजीव नाईक यांना सोपी नाही, भार्इंदर तसेच ठाणे आणि खुद्द नवी मुंबईतच प्रखर विरोध होणार आहे, असे भाकीत लोकमतने सतत वर्तविले होते. ते खरे ठरले. कल्याणमध्ये अत्यंत नवा चेहरा असलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने मतदारांनी सेनेच्याच उमेदवाराला पुन्हा एकदा खासदारकी बहाल केली. भिवंडीत भाजपाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून आपल्या गोटात ओढलेल्या कपिल पाटील यांनी आगरी, कुणबीसह सर्वच समाजांची मते मिळवून काँग्रेसच्याच विश्वनाथ पाटलांचा पराभव घडविला. यामुळे विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी दिल्यास संपूर्ण कुणबी समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील हा काँग्रेसचा व आघाडीचा अंदाजही मतदारांनी असफल ठरविला. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधवांना पराभूत करून मतदारांनी अॅड़ चिंतामण वणगांच्या रूपाने महायुतीला विजयी केले.
ठाण्यात नमोपुढे ‘रागा’ भुईसपाट
By admin | Updated: May 17, 2014 01:40 IST