लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर कार आणि खाजगी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील चार जण ठार झाल्याची घटना भिवंडीतील पिंपळास गावाच्या हद्दीत सोमवारी पहाटे घडली. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
गोकूळ मधुकर गवते (२९, रा. पिंपळगाव निफाड, नाशिक), पंकज भागीरथ जावळे (२९, रा. सिन्नर), कारचालक ज्वालाविजय बहादूर सिंग (वय २७, रा. नाशिक), गौरव सुधीर सिंग (वय २७, रा. नाशिक) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे चौघेही नाशिकहून ठाण्याकडे जात हाेते. मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पिंपळास गावाजवळ आले असता कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार रस्त्यामधील दुभाजकावर आदळली. त्यानंतर विरुद्ध दिशेला फेकली जाऊन मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या एका खाजगी बसला धडकली. हा अपघात एवढा भयंकर होता की, कारचा चेंदामेंदा होऊन कारमधील चार जण ठार झाले. या अपघात प्रकरणी बस चालकाने कारचालकावर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, या अपघाताचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेरखान करीत आहेत.