Join us  

दोन मिनिटांच्या उशीरामुळे 10 विद्यार्थ्यांच्या MPSC चे वर्ष वाया जाणार !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 5:58 AM

परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला : मेगाब्लॉकमुळे १० विद्यार्थी पोहोचले ‘लेट’

मुंबई : परीक्षेआधी किमान अर्धा ते एक तास केंद्रावर पोहोचावे असा एमपीएसीचा नियम आहे. मात्र, रविवारचा मेगाब्लॉक, गुर्जर आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीला बसलेला फटका अशा अनंत अडचणींशी सामना करत पोहोचण्यास दोन मिनिटांचा उशीर झाल्याने दिल्ली, पुणे आणि मुंबई येथील १० विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न दिल्याने त्यांचे वर्ष वाया जाणार आहे.

परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयातील एमपीएससी परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. या परीक्षेसाठी मुंबई, पुणे, दिल्लीपर्यंतचे विद्यार्थी एम. डी. कॉलेजमध्ये दाखल झाले होते. सकाळी १० च्या परीक्षेच्या वेळेसाठी साडे नऊ वाजता गेट बंद करण्यात आले. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांमध्ये पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्याचे कारण सांगून अडवणूक केली. विनंती करूनही त्यांना परीक्षेला बसू देण्यात आले नसल्याची माहिती परीक्षेसाठी पनवेलहून आलेल्या अमोल मदने या उमेदवाराने दिली. विद्यार्थ्याच्या गोंधळानंतर तेथील स्थानिक आमदार, कामगार संघटना अधिकारी आणि विविध मान्यवरांना माहिती देऊन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परवानगी देण्याची विनंती करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे चेअरमन चंद्रशेखर ओक यांच्याशी संपर्क साधला. अखेर ओक यांनी या विद्यार्थ्यांना रविवारी होणाऱ्या दुसºया पेपरला बसायची परवानगी दिली. मात्र, याचा काहीच उपयोग होणार नसून आता या उमेदवारांना आता पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांची एका वर्षाची मेहनत वाया जाणार आहे. एमपीएससी परीक्षेतील इतर अनेक भोंगळ कारभारांचा सामना विद्यार्थी निमूटपणे सहन करतात. तेव्हा कुठलाही नियमभंग होत नाही. पण जेव्हा विद्यार्थ्यांची अडचण होते, तेव्हा परीक्षा अधिकारी नियमावर बोट ठेवून मुजोरपणा करतात.- अमोल मदने,एमपीएससी उमेदवार.

टॅग्स :एमपीएससी परीक्षामुंबई