Join us  

तुम्ही एसी मध्ये, पशुपक्ष्यांनी जायचे कुठे? पॉज संस्थेकडून उपचार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 10:03 AM

मुंबई महानगर प्रदेशात दोन दिवसांपासून उष्णतेची लाट येत असून, कमाल तापमानाने चालू हंगामातील उच्चांक गाठला आहे.

मुंबई :मुंबई महानगर प्रदेशात दोन दिवसांपासून उष्णतेची लाट येत असून, कमाल तापमानाने चालू हंगामातील उच्चांक गाठला आहे. मुंबईचे तापमान ३९ अंश नोंदविण्यात आले असून, वाढत्या उष्माघाताचा त्रास माणसांसह पशुपक्ष्यांनाही होत आहे. या मुक्या जनावरांना दिलासा मिळावा म्हणून उष्माघाताचा फटका बसलेल्या पशुपक्ष्यांवर पॉज संस्थेच्या वतीने उपचार करण्यात येत आहे. 

पशुपक्ष्यांची काळजी कशी घ्यावी? याबाबतही पॉजकडून मुंबईकरांना मार्गदर्शन केले जात आहे. ठिकठिकाणी प्राण्यांसाठी भांड्यात पाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

पशुपक्ष्यांना उष्माघात होत असल्याची माहिती आमच्या स्वयंसेवकांना मिळत आहे. त्यानुसार, ठिकठिकाणी दाखल होत उपचार केले जात आहेत. सर्पाची आणि पक्ष्यांची सुटका करण्यात आली आहे. प्राणी आणि पक्ष्यांवर उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले जात आहे.- सुनिश सुब्रमण्यम, मानद वन्यजीव रक्षक

तहानलेल्या पशुपक्ष्यांना पाणी मिळेल, अशी व्यवस्था प्रत्येकाला करता आली तर करावी. यासंदर्भातील एखादी घटना लक्षात आली तर १९२६ या वनविभागाच्या क्रमांकावर किंवा पॉजच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.- निशा कुंजू, मानद प्राणी कल्याण अधिकारी

उष्माघाताचा त्रास होत असल्याचे लक्षात आले तर पुरेशा प्रमाणात पाणी द्या. डोक्यावर बर्फ ठेवा. ओला टॉवेल पाठीवर ठेवा. शरीरावर पाणी शिंपडा. मोकळी हवा मिळेल, अशी व्यवस्था करा - डॉ. राहुल मेश्राम, पशुवैद्य एसीएफ आणि पॉज, मुंबई

टॅग्स :मुंबईतापमान