बोईसर : पूर्वेकडील बेटेगावाजवळीत कांबळगाव येथील एकलव्य रेसिडेन्सियन शाळेच्या सात शिक्षकांनी वेतनश्रेणी लागू न केल्याच्या निषेधार्थ विविध पाच मागण्यांकरिता शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी हित लक्षात घेता सेवा कर्तव्यावर हजर राहून सदर अन्नत्याग उपोषण केले आहे.ही शाळा आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येत असून सर्व शिक्षकांनी परिविक्षाधीन कालावधी कांबळगाव येथीलच शाळेत पूर्ण केला आहे. हे शिक्षक डिसेंबर २०१० पासून कार्यरत आहेत, तर परिविक्षा कालावधी डिसेंबर २०१३ ला पूर्ण झाला आहे. परंतु यापुढेही शिक्षकांच्या सेवा मानधनावरच सुरु ठेवण्यात याव्यात, असे घोषित करण्यात आले आहे. परंतु सदर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आदेशाने किंवा जाहिरातीतील कायमस्वरुपी मानधन तत्त्वावर नेमणूक असा कोठेही उल्लेख नसल्याने तीन वर्षांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर सात महिने उलटून गेल्यावर असे घोषित करणे ही एक प्रकारची फसवणूक असल्याचे उपोषणकर्त्यांनी प्रतिज्ञा पत्रात नमूद केले आहे.प्रतिज्ञापत्रात उपोषणकर्त्यांनी २८ मार्च १९९५ च्या शासन परिपत्रकानुसार परिविक्षाधीन कालावधी संपल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत आदेश निर्गमित करण्यात यावेत, असा उल्लेख असून या आदेशाची काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापना अधिकाऱ्यांची राहील, असाही उल्लेख आहे. असे असतानाही आम्हाला सात महिन्यांची वाट पहावी लागत असल्याने नाराजी व्यक्त केली.महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विभागाच्या नाशिक येथील आयुक्तांनी केलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ सदर उपोषण सुुरु केले असून उपोषणाला अनिल मंगळे, दयानंद विधाते, सतीश श्रीराव, सुनील देठे, विजय डाबरे, नरेशकुमार सपकाळ व प्रमोदागी गोसावी हे सहा शिक्षक आपल्या मागण्यांसाठी बसले आहेत. (वार्ताहर)
शिक्षकांचे अन्नत्याग उपोषण
By admin | Updated: August 10, 2014 23:43 IST