नवी मुंबई : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठोक मानधनावरील शिक्षकांच्या पगारावरून राजकारण सुरू झाले आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध करून सभा तहकूब करण्यास भाग पाडले. मंगळवारी शिवसेनेने आक्रमक होवून प्रस्ताव तत्काळ मार्गी लावण्याची मागणी केली. महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळामध्ये ठोक मानधनावरील शिक्षकांना पगारवाढ देण्याचा ठराव मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेत घेऊन येण्याचे आश्वासन महापौर सागर नाईक यांनी दिले होते. परंतु ९ मार्चला सर्वसाधारण सभेत प्रस्ताव न आल्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जमिनीवर बसून प्रशासनाचा निषेध केला. अखेर महापौरांनी सभेचे कामकाज बंद करून मंगळवारी प्रशासनाने प्रस्ताव मांडावा असे आदेश दिले. परंतु प्रशासनाने कोणताही ठराव न आणल्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. सत्ताधाऱ्यांना अडचणीमध्ये आणण्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्थितीमध्ये पगारवाढ करण्याची मागणी केली. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मात्र आज जमिनीवर बसला, मग कालच का साथ दिली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याविषयी प्रशासनाची बाजू मांडताना सांगितले की, शिक्षकांना वेतनवाढ देण्याचा ठराव प्रथम शिक्षण मंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर झाला पाहिजे. त्यांनी सदर ठराव पाठविल्यानंतर तो सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवता येईल असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
पालिकेत शिक्षकांच्या पगाराचे राजकारण
By admin | Updated: March 11, 2015 00:20 IST