नवी मुंबई : युतीचे सरकार असताना त्यांनी माथाडींची १५०० घरे बोगस संस्थेच्या घशात घातली होती. संघर्ष करून ती घरे माथाडींना परत मिळवावी लागली. त्यामुळे घर हडपणाऱ्यांना ते देण्याची भाषा शोभत नाही, असा पलटवार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. एमआयडीसीतून माथाडींना हद्दपार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मतदानातून धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले.एपीएमसीत माथाडी कामगार मेळावा झाला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, माथाडी कामगारांना शरद पवार यांनी भक्कम साथ दिली. कामगारांना घरे मिळवून दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोपरखैरणेत सभा घेवून आम्ही कामगारांना घरे मिळवून देऊ अशा वल्गना केल्या. परंतु, माथाडींची १५०० घरे त्यांनीच बोगस संस्थेच्या घशात घातली.गणेश नाईक यांनीही सरकार माथाडी कायदा रद्द करण्याचा डाव रचत असल्याची टीका केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘माथाडी कायदा हटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हे षड्यंत्र रचणाऱ्या सरकारला कामगारांची ताकद दाखवून देवू या,’ असे आवाहन त्यांनी केले. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनीही सरकारवर सडकून टीका केली. आपण हक्कासाठी लढा देत असताना यांचे नेते कुठे असतात. सत्ता येताच अडत रद्द केली, असे शरसंधान केले. यावेळी माथाडी संघटनेचे एकनाथ जाधव, चंद्रकांत पाटील, गुलाबराव जगताप, संजय पाटील उपस्थित होते.
घरे हडपणाऱ्यांना धडा शिकवा!
By admin | Updated: April 21, 2015 05:41 IST