ठाणे : जागतिक तंबाखूविरोधी दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यस्तरीय तंबाखूविरोधी जनजागृती कार्यक्रम रविवारी सकाळी गडकरी रंगायतन येथे पार पडला. या एकदिवसीय कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत याच्या हस्ते संपन्न झाला.तंबाखू हे आज समाजाच्या आरोग्यावर आलेले सर्वात मोठे संकट असून वर्षाला ६ दशलक्ष लोक तंबाखूसेवनाने मृत्युमुखी पडतात, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. भारत हा जगभरात तंबाखू खाणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आता जर काळजी घेतली नाही तर २०३० पर्यंत तंबाखू खाऊन होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ८ दशलक्ष इतके वाढेल, असेही आरोग्य खात्याने केलेल्या सर्वेक्षणात सिद्ध झाल्याची माहितीही त्यांनी दिली.या वेळी तंबाखूविरोधी जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय, मुंबई यांच्यातर्फे ठाणे शहरातून रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत ७००-१००० नागरिकांनी सहभाग दर्शविला. तसेच ठाणे जिल्हा रुग्णालयातर्फे या दिनानिमित्त मौखिक आरोग्य तपासणी ठेवण्यात आली होती. या वेळी मरणोत्तर अवयवदान करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे कामही या जिल्हा रुग्णालयातर्फे करण्यात आले.
टाटा हॉस्पिटल लवकरच ठाण्यात - आरोग्य मंत्री
By admin | Updated: May 31, 2015 22:36 IST