पेण : हेटवणे धरणाचे पाणी मिळावे यासाठी टाहो फोडणाऱ्या भाल विठ्ठलवाडी व मोठे भाल गावांच्या १५०० ग्रामस्थांचे उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच आहे. कामधंदा, रोजीरोटी यांची पर्वा न करता हेटवणेचे पाणी घेवूनच गावात जाणार या निश्चयाने प्रांत कार्यालयासमोर पाच दिवसांपासून १४ गावकरी उपोषणास बसले आहेत. पैकी चौघांची प्रकृती खालावल्याने त्यांना पेण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाण्याचे मूळ स्रोत असलेला हेटवणे मध्यम प्रकल्पात विपुल पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत १४७.४९ एकूण पाणी साठ्यापैकी उपयुक्त पाणीसाठा १३७.६२५ दलघमी आहे. यामधून सिडको नवी मुंबईला ५४.७५ दलघमी पेण शहर २.५० दलघमी, सिंचनासाठी ५३.०७ दलघमी टाटा वीज कंपनी ५.०० दलघमी व वाशी खारेपाटासाठी ०.४० दलघमी पाणी वाटप प्रकल्पसंस्थेच्या वितरण व्यवस्थेतील पाणीसाठा चार्टमध्ये दाखविलेले आहे. सिंचनासाठी ९८.०९ दलघमी आरक्षित पाणीसाठ्यापैकी ५३.७७ दलघमी सिंचनाचा पाणी वापर असताना ८० हेक्टर क्षेत्र सिंचनाला ४.०० दलघमी पाणी वापर होतो धरणात तब्बल ९८.०९ ते ८०.०० दलघमी पाणी पडून आहे.हेटवणे प्रकल्प ते शहापाडा धरण १९ कि.मी. अंतराची स्पेशल नळपाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव एमजेपीने २००९ सालीच पाणी पुरवठा विभागास सादर केला होता. २२ कोटी खर्चाची ही योजना गेली सहा वर्षे मंत्रालयात फाईल पडून आहे. ही योजना आता ३५ ते ४० कोटींच्या घरात गेलीय. २२ गावे व ४३ वाड्यांना योजनेचा लाभ होणार आहे. उपोषणास बसलेल्या १४ उपोषणकर्त्यांपैकी चांगदेव महादेव म्हात्रे (४५), चंद्रभागा चंद्रकांत म्हात्रे (६०), ताराबाई रणछोड म्हात्रे (६०) वंदना कैलास म्हात्रे (४५) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या उपोषणाचे पडसाद विधिमंडळात होण्याची शक्यता असून याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. (वार्ताहर)
उपोषणकर्त्यांचा पाण्यासाठी ‘टाहो’
By admin | Updated: March 13, 2015 22:32 IST