Join us  

राज्यात स्वाइन फ्लूचे १८८ बळी! सर्वाधिक मृत्यूंची नोंद नाशिकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 7:09 AM

जानेवारी ते जून या कालावधीत राज्यभरात स्वाइन फ्लूमुळे १८८ जणांचा बळी गेल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबई : जानेवारी ते जून या कालावधीत राज्यभरात स्वाइन फ्लूमुळे १८८ जणांचा बळी गेल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. त्यातील सर्वाधिक मृत्यू नाशिकमध्ये झाले असून, ३४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नागपूरमध्ये २५, अहमदनगरमध्ये १६, पुण्यात १३ आणि मुंबईत पाच जणांना या आजारामुळे जीव गमवावा लागला आहे.राज्यात जानेवारी ते जून या काळात १ हजार ६३५ बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांत औषधोपचार सुरू आहेत, तर जानेवारी ते जून या कालावधीत २१ हजार २८६ संशयित रुग्णांना आॅसेलॅटॅमिवीर गोळ्या देण्यात आल्या आहेत.गेल्या वर्षी २०१८ साली राज्यात वर्षभरात ४६१ मृत्यू झाले होते, तर २ हजार ५९३ रुग्णांची नोंद करण्यात आली होती.२०१५-१६ साली १ लाख १ हजार ३५६ गर्भवती, उच्च रक्तदाब आणि मधुमेही रुग्णांना, तसेच आरोग्य कर्मचारी यांना स्वाइन फ्लूची लस देण्यात आली होती, तर १ जानेवारी, २०१७-३० जून, २०१८ अखेर चार लाख २ हजार ४९२ व्यक्तींना लसीकरण देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. यंदा देशभरातही स्वाइन फ्लूचा विळखा कायम असून, सर्वाधिक बळी राजस्थान राज्यात गेले आहेत. या राज्यात जानेवारी ते जून या कालावधीत २०५ मृत्यू झाले असून, स्वाइनच्या रुग्णांची संख्या ५ हजार २०१ इतकी आहे. त्यानंतर, खालोखाल महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये या आजाराचा आलेख चढता आहे.

टॅग्स :स्वाईन फ्लू