मुंबई : ढाक्कू... माकूमच्या जयघोषात थरांवर थर रचण्याची नशा भिवंडीच्या जय महाराष्ट्र गोविंदा पथकातील नागेश भोईर आणि त्याच्या कुटुंबाला आयुष्यभराचे दु:ख देऊन गेली. सहाव्या थरावरून खाली पडलेला हा गोविंदा तब्बल सात वर्षे अंथरुणाला खिळला आहे. नोकरी गेली आणि राजकीय पुढाऱ्यांनीही पाठ फिरवली. त्यामुळे त्याच्या उपचारांसाठी आणि उदरनिर्वाहासाठी भोईर कुटुंबावर वणवण फिरण्याची वेळ ओढवली आहे.भिवंडीत दहा बाय दहाच्या खोलीत राहणारे भोईर कुटुंब. आई गृहिणी. वडील खासगी कंपनीत नोकरी करत होते. ब्रेन ट्युमरमुळे घरी बसलेली बहीण अशा परिस्थितीत नागेशने दहावीनंतर शाळा सोडली आणि मिळेल ते काम हाती घेतले. लहानपणापासूनच नागेशला दहीहंडीतल्या थरांचे प्रचंड आकर्षण होते. सुरुवातीला त्याने परिसरातल्या गोविंदा पथकांमध्ये सहभागी होऊन हंड्या फोडल्या. १९व्या वर्षी मात्र त्याने भिवंडीतील प्रसिद्ध जय महाराष्ट्र गोविंदा पथकासोबत सराव सुरू केला. पाहता पाहता तो या पथकाचा सदस्य बनला. त्यानंतर काही वर्षे या पथकासोबत त्याने मुंबई, ठाण्यातल्या मानाच्या हंड्या फोडल्या. मात्र हीच हौस आणि थरांवर चढण्याची नशा आपले आयुष्य उद्ध्वस्त करेल, असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. आईच्या विरोधाला न जुमानता तो सात ते आठ थरांवर चढू लागला. २००९ मध्ये चेंबूरमध्ये ब्राह्मण आळीतील टिळक चौक मित्र मंडळाने बांधलेली हंडी फोडण्यासाठी नागेश आपल्या पथकासोबत आला. सहाव्या थरावर चढून त्याने हंडी फोडली. पण हंडी बांधलेला दोरखंड तुटला आणि त्यावर लोंबकळणारा नागेश थराबाहेर रस्त्यावर पडला. या अपघातात गंभीर जखमी झालेला नागेश आजतागायत आपल्या पायांवर उभा राहिलेला नाही. खासगी दवाखान्यापासून ते मुंबईतील केईएम, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊनही त्याचे अपंगत्व कायम राहिले.सुरुवातीला काही राजकीय मंडळींचे मदतीचे हात पुढे आले. त्यातून एक शस्त्रक्रिया पार पडली. मात्र एवढ्यावर भागणारे नव्हते. नागेशला आणखी उपचारांची आणि त्यासाठी मोठ्या मदतीची आवश्यकता होती. तेव्हा मात्र राजकीय पुढाऱ्यांनी हात वर केले. शासनानेही पाठ फिरवली. त्यामुळे आईने होते नव्हते तेवढे दागिने विकले. वडिलांनी नातेवाइकांकडून कर्जाचा डोंगर उभा केला. मित्रांनी एकेक पैसा जमा करून नागेशच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या खर्चाची रक्कम उभी केली. मित्र आणि नातेवाइकांच्या मदतीने दोन शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर अपघाताच्या सहा वर्षांनंतर तो व्हीलचेअरच्या माध्यमातून हालचाल करू लागला. त्याने भोईर कुटुंबीयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.अपघातानंतर नागेशचे जीवन पूर्णत: विस्कळीत झाले. दहीहंडीचा उत्सव हा केवळ आयोजकांच्या प्रसिद्धीपुरता मर्यादित राहिल्याचे त्याचे म्हणणे आहे. दहीहंडी उत्सावानिमित्त रंगलेल्या चढाओढीत आयोजक कोट्यवधी रुपये खर्च करतात. मात्र स्वत:च्या जिवाची पर्वा न करता या साहसी क्रीडाप्रकारात सहभागी झालेल्या गोविंदांकडे मात्र ही मंडळी सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात, असे निराश नागेश सांगतो. आयोजकांपैकी आजतागायत एकानेही त्याची साधी चौकशीही केलेली नाही. मदतीसाठी सर्व राजकीय पुढाऱ्यांच्या मंडळींच्या पायऱ्या झिजवल्या, मात्र मदतीचे आश्वासन देऊन ही मंडळी नंतर फोन उचलत नसल्याचेही नागेशचे म्हणणे आहे. त्यातही दहीहंडीचे मनोरे पाच थरांपर्यंतच मर्यादित ठेवणे गरजेचे झाले असल्याचेही तो सांगतो. कुटुंबीय मदतीच्या प्रतीक्षेतसलग दोन शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर डॉक्टरांनी त्याला तिसरी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याला अडीच लाखांची आवश्यकता आहे. सध्या होते तेवढे पैसे नागेशच्या उपचारात खर्च झाले. अशात वडिलांच्या अवघ्या सात हजार पगारावर घरखर्चाबरोबर मुलीच्या औषधाचा खर्च उचलणे जड जात आहे. अशात पुन्हा एवढे पैसे कसे उभे करायचे असा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी मदतीसाठी हात पुढे करावा, अशी मागणी नागेशची आई नलिनी भोईर यांनी लोकमतशी बोलताना केली.
थरांच्या नशेने आयुष्य उद्ध्वस्त
By admin | Updated: August 26, 2015 04:15 IST