Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी विद्यार्थी राहणार शाळेत हजर, पण घरातूनच ऑनलाईन....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:07 IST

उन्हाळी सुटीनंतर शाळा प्रत्यक्षात उघडणार नसल्या तरी ऑनलाईन होणार सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी ...

उन्हाळी सुटीनंतर शाळा प्रत्यक्षात उघडणार नसल्या तरी ऑनलाईन होणार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी विद्यार्थी सुरक्षिताता लक्षात घेऊन तूर्तास नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे आजपासून राज्यातील बरेच विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुटीनंतर पुन्हा एकदा अभ्यासाला लागणार आहेत, मात्र ऑनलाईन पद्धतीनेच. मागील वर्षीही लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाचा प्रत्यक्ष आनंद अनुभवता आला नव्हता आणि यंदाही शिक्षक आणि वर्गशिक्षकांची तोंडओळख ऑनलाईलनच करून घ्यावी लागणार आहे. दरम्यान, याही परिस्थितीत नवीन वर्ग, मित्र, नवीन शिक्षक यामुळे त्यांच्यातील उत्साह मात्र कायम आहे.

शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार नवीन वर्षाची सुरुवात यंदा नवीन अभ्यासक्रमाने न होता उजळणीने होईल. मात्र, ती उजळणी कशी व कोणत्या घटकांची असावी? कोणत्या विद्यार्थ्यांची असावी, याबाबत शिक्षण विभागाकडून शाळा, मुख्याध्यापक, शिक्षकांना काहीच सूचना अद्याप आलेल्या नाहीत. शाळांच्या पहिल्या दिवशी येणाऱ्या शैक्षणिक वर्षासंदर्भात आपण काहीच आराखडा विद्यार्थ्यांसमोर सादर करू शकणार नाही, याची खंत मुख्याध्यापक व्यक्त करीत आहेत. विविध शैक्षणिक व्हिडिओ, पीपीटी, शिक्षण साधने, स्वाध्याय पर्याय, ऑनलाईन प्रकल्प अशा विविध पर्यायांना हाताशी ठेवून शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविण्यासाठी तयार आहेत. मात्र, शिक्षण विभागाकडून अभ्यासक्रम किती वेळेत, कसा, कुठल्या विषयांचा पूर्ण करून घ्यावा याबाबत मार्गदर्शक सूचनाच नसल्याने त्यांची तयारी अर्धवट असल्याच्या उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

* प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न कायम

शाळा बंद असल्यामुळे राज्यभरातील शाळांतील विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने शाळेच्या पहिल्या दिवसाला हजेरी लावतील; मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्याची सोय नाही ते या पहिल्या ओळखीच्या क्षणापासून वंचितच राहणार आहेत. अनेक विद्यार्थी लॉकडाऊन काळात आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले गेले आहेत, स्थलांतरित झाले आहेत, त्या विद्यार्थ्यांना डेटा पॅक, स्मार्टफोनअभावी शाळेच्या पहिल्या दिवसाला मुकावे लागेल. अद्याप या विद्यार्थ्यांविषयी काय करता येईल? कोणत्या उपाययोजना अमलात आणता येतील याबद्दल शिक्षण विभागाने काहीच कार्यवाही केली नसल्याची प्रतिक्रिया स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी दिली.

....................................................