Join us  

कांदिवलीत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारताना दीड वर्षे करावा लागला संघर्ष!

By मनोहर कुंभेजकर | Published: August 16, 2023 6:51 PM

उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश

मनोहर कुंभेजकर, मुंबई: गेल्या दि,२५ डिसेंबर २०२२ कांदिवली (पूर्वे),पश्चिम दुर्तगती महामार्गा लगत अटलबिहारी वाजपेयी उत्कृष्टता केंद्र येथे  वाजपेयी यांच्या जयंती निमित्त या पुतळ्याचे अनावरण होणार होते.पुतळा उभारण्यासाठी सर्व परवानग्या मिळाल्या होत्या.मात्र आघाडी सरकारचे तत्कालीन क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी गेल्या दि,२४ डिसेंबर २०२२ रोजी सदर पुतळा उभरण्यास परवानगी नाकारली होती! उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी गेली दीड वर्षे यांसाठी लढा दिला होता. आघाडी सरकार मधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यात अडथळा निर्माण केला.खासदार शेट्टी व  निवडक भाजप कार्यकर्त्यांनी दि,२८ डिसेंबर २०२२ रोजी महाआघाडी सरकार मधील माजी क्रीडा  मंत्री सुनील केदार यांच्या बंगल्यावर त्यांना  भेटण्यास गेलो असता त्यांच्या सह भाजप कार्यकर्त्यांना  पोलिसांनी अटक केली. गेल्या हिवाळी अधिवेशनात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुंबई  भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी खासदार शेट्टी यांची मुक्तता करा ही मागणी लावून धरत वाजपेयी यांच्या पुतळ्यास परवानगी नाकारणाऱ्या महाआघाडी सरकारचा निषेध करत हा मुद्दा त्यांनी  विधानसभेत उचलून धरला होता. खासदार गोपाळ शेट्टी यांनी वाजपेयी यांच्या पुतळ्यास अटकाव करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करत संसदेत हक्कभंग आणला होता.

अखेर सरकार बदलताच वाजपेयी यांच्या पुतळ्याला मिळाली परवानगी

सुमारे दीड वर्षे देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा कांदिवली येथे पुतळा उभारण्यास महाआघाडी सरकारने परवानगी नाकारली होती.अखेर सरकार बदलताच वाजपेयी यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला ऑगस्ट २०२२ च्या सुरवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली. माजी पंतप्रधान भारतरत्न  अटलबिहारी वाजपेयी यांचा येथे भव्य पुतळा उभारण्यास परवानगी मिळाली.आणि सुमारे ३००० भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाजपेयी यांचा १८ फुटी ब्रॉंझचा पुतळा वाजत गाजत दहिसर ते कांदिवली अशी मिरवणूक काढून आणि महाविकास आघाडीच्या काळात संघर्षं करून उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी दि,१३ ऑगस्ट २०२२ रोजी उभारला होता.त्याची आठवण नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितली होती याची आठवण दस्तुरखुद्द खासदार गोपाळ शेट्टी यांनी  सदर संघर्षमय कहाणी लोकमतला सांगितली.

वाजपेयी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त वाहिली श्रद्धांजली

माजी पंतप्रधान भारतरत्न  अटलबिहारी वाजपेयी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त आज कांदिवलीतभारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उत्कृष्टता केंद्रच्या (सेंटर ऑफ एक्सलन्स) संकुलात एका कार्यक्रमात खासदार गोपाळ शेट्टी यांनी श्रद्धांजली वाहिली. वाजपेयी यांच्या जीवनावरील कवितांचाही उल्लेख केला आहे.कांदिवली पूर्वेला हा पुतळा बसवताना कसा संघर्ष झाला, उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारने हा पुतळा बसवण्यात कसे अडथळे निर्माण केले याचा उहपोह त्यांनी केला. यावेळी कारगिल शहिदांच्या अस्थिकलश घेऊन देशभर प्रवास करणारे देशभक्त उमेश गोपीनाथ यादव यांना शाल , पुष्पगुच्छ आणि पुस्तकं देऊन त्यांचे खासदार शेट्टी यांनी सत्कार केला. यावेळी त्यांनी झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून सकारात्मक भूमिका घेतल्याचा उल्लेख केला. आणि आपला गेली ९ वर्षे संघर्ष यशस्वी झाला असला तरी, पुढे गोरगरिबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचा ठाम निर्धार  व्यक्त केला.

यावेळी ज्येष्ठ नेते अँड.जयप्रकाश मिश्रा म्हणाले की,खासदार गोपाळ शेट्टी हे असे नेते आहेत की,ज्यांनी अनेक महापुरुषांचे पुतळे उत्तर मुंबईत उभारले  प्रत्येक महापुरुषाच्या पुण्यतिथीला ते  कार्यक्रम आयोजित करतात,त्यामुळे आपण सर्व एकत्र येवून महापुरुषांना श्रद्धांजली वाहतो.उत्तर मुंबईतील भाजप कार्यकर्ते व नागरिकांना महापुरुषांच्या जीवन चरित्राची विशेष माहिती त्यांच्या प्रयत्नातून उपलब्ध होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांची प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस बाबा सिंग यांनी केले. यावेळी उत्तर मुंबईचे सर्व माजी नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते श्रीकांत पांडे, मुंबई भाजप सचिव विनोद शेलार यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :अटलबिहारी वाजपेयीगोपाळ शेट्टी