Join us  

रस्त्यांना ‘ओखी’चा तडाखा, खड्ड्यांचे दुखणे पुन्हा डोके वर काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 1:47 AM

मुंबईच्या किनारपट्ट्यांवरूनच गुजरातच्या दिशेने निघून गेलेल्या ओखी वादळाने मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला. मात्र अवेळी पडलेल्या पावसाने मुंबईत सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीला फटका बसला.

शेफाली परबमुंबई : मुंबईच्या किनारपट्ट्यांवरूनच गुजरातच्या दिशेने निघून गेलेल्या ओखी वादळाने मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला. मात्र अवेळी पडलेल्या पावसाने मुंबईत सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीला फटका बसला. परिणामी, खड्ड्यांचे दुखणे डोके वर काढण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईचे रस्ते उखडतात. यामुळे पालिका प्रशासनाने रस्ते दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहे. पावसाळ्याचे चार महिने संपताच आॅक्टोबरपासून या कामांना सुरुवात झाली. तरीही या वर्षी अधूनमधून हजेरी लावणाºया पावसाने रस्त्यांच्या कामामध्ये व्यत्यय आणलेच. त्यात आता ओखी वादळामुळे सोमवार रात्रीपासून बरसलेल्या पावसाने अडचणीत भर पडली आहे.चर्चगेट येथील मुंबई विद्यापीठानजीक व फॅशन स्ट्रीटजवळच्या मुख्य रस्त्यावर या पावसाने आपली छाप सोडली आहे. या रस्त्यावर ५० छोटे-मोठे खड्डे आहेत. एवढेच नव्हे, तर पावसामुळे हा रस्ता निसरडा होऊन अपघाताचा धोका वाढला होता. तर लालबाग उड्डाणपुलाचे रिसर्फेसिंग ब्लकटॉपिंगने सुरू असताना ७२ तास होण्याआधीच पाऊस पडला. उड्डाणपुलावर काही ठिकाणी पाणी तुंबत असल्याने रस्ता पूर्ण कोरडा होईपर्यंत काम शक्य नाही. त्यामुळे येथे खड्डे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.रस्त्याची कामे होती बंदआॅक्टोबर महिन्यात रस्ते दुरुस्ती सुरू झाल्यापासून दोनवेळा पावसाने अनपेक्षित हजेरी लावली. दिवाळीपर्यंत दररोज संध्याकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रस्त्याची कामे महापालिकेला बंद ठेवावी लागली होती.मुंबईत चारशे रस्ते आणि मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. तर यापैकी १३० रस्ते पूर्व उपनगरातील आहेत. बहुतेक रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत होती. काही रस्ते खणलेले होते. त्यामुळे अवेळी पावसाने या कामांचे तीनतेरा वाजवले आहेत.मे २०१८पर्यंत रस्ते दुरुस्ती पूर्ण करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. मात्र पावसामुळे काही ठिकाणी नव्याने खड्डे पडले. रस्ते पूर्ण कोरडे झाल्याशिवाय आता काम शक्य नाही, अशी हतबलता रस्ते विभागाच्या अधिकाºयाने व्यक्त केली.गेल्या वर्षीच्या तुलनेत खड्डे कमीगेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण तुलनेने कमी झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने गेल्या महिन्यात केला होता.२०१४-१५मध्ये महापालिकेकडे १४ हजार ४५५ खड्ड्यांच्या तक्रारी आल्या होत्या. २०१५-२०१६मध्ये पाच हजार ३१६ तर २०१६-२०१७मध्ये चार हजार ४७८ खड्ड्यांच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या.या वर्षी १ एप्रिल २०१७ ते आॅक्टोबर २०१७ या सहा महिन्यांत एक हजार ४६३ खड्ड्यांच्या तक्रारी आल्या आहेत. यापैकी एक हजार ३२७ तक्रारींचे म्हणजेच ९०.७० टक्के इतक्या तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.हे खड्डे बुजविण्यासाठी २०१५-१६मध्ये २५ हजार १३० मेट्रिक टन एवढे डांबर वापरण्यात आले होते. तर वर्ष २०१६ -१७मध्ये २९ हजार ६३७ मेट्रिक टन डांबर वापरण्यात आले होते.या वर्षी आॅक्टोबर महिन्यापर्यंत १३ हजार ३४ एवढे मेट्रिक टन डांबर वापरण्यात आले आहे.

टॅग्स :ओखी चक्रीवादळखड्डे