मुंबई : मागील आठवडाभरापासून मुंबई शहर आणि उपनगरांना झोडपून काढलेल्या पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरासह उपनगरांतील डांबरी आणि पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेल्या रस्त्यांची दुर्दशा झाली असून, मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मात्र यावर बचावात्मक पवित्रा घेतला आहे.मुंबई महानगरपालिका प्रशासनाने या वर्षी रस्त्यांसाठी तब्बल २ हजार ५०० कोटी एवढ्या रकमेची तरतूद केली आहे. शिवाय यातील ५० कोटी एवढी रक्कम रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी वेगळी बाजूला काढून ठेवली आहे. मात्र सद्य:स्थितीमध्ये जोरदार पावसामुळे डांबरी रस्ते आणि पेव्हर ब्लॉक बसविलेल्या रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. ‘व्हाइस आॅफ सिटीजन’ या संकेतस्थळावरील नोंदीनुसार, मुंबईत एकूण १ हजार ८४१ एवढे खड्डे नोंदविले आहेत. त्यापैकी १ हजार ६६२ खड्डे बुजविण्यासाठीचे नियोजन केले आणि १ हजार ५६० खड्ड्यांची पाहणी करीत त्यापैकी १ हजार ४१७ खड्डे बुजविले आहेत.प्रत्यक्षात मात्र संकेतस्थळावरील आकडे वगळता रस्त्यांवर नजर टाकली असता मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील शीतल, कमानी आणि घाटकोपर येथे ठिकठिकाणी टाकलेले डांबरी खड्यांचे स्पीड ब्रेकर पावसाच्या पाण्यात काहीसे वाहून गेले आहेत. शिवाय कमानी येथील काळे मार्गालगतची खडीही पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेली आहे. शिवाय एलबीएस मार्गावरील गांधीनगर जंक्शन, वडाळा, आंबेडकर रोड, पी. डिमेलो मार्ग, अंधेरी-कुर्ला रोड, भायखळा येथील रस्त्यांवरही खड्डे पडले असून, महापालिकेने याकडे कानाडोळा केला आहे. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरांतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याची जबाबदारी महापालिकेने अभियंत्यांवर सोपविली आहे. परंतु अभियंत्यांकडून देखील याकामी हलगर्जीपणा केला जात असल्याचा आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला आहे. (प्रतिनिधी)
पावसाने उखडलेमुंबईतील रस्ते!
By admin | Updated: July 14, 2014 02:32 IST