Join us

कर्जरोख्यावरून स्थायी समितीत वादळी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना काळात उत्पन्न कमी आणि खर्च वाढल्याने आर्थिक स्थिती सावरण्यासाठी महापालिकेने शेअर बाजारातून कर्जरोखे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना काळात उत्पन्न कमी आणि खर्च वाढल्याने आर्थिक स्थिती सावरण्यासाठी महापालिकेने शेअर बाजारातून कर्जरोखे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत अनभिज्ञ असलेल्या स्थायी समिती सदस्यांनी पालिका प्रशासन आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर बुधवारी तोफ डागली. विविध बँकांमध्ये महापालिकेच्या ८० हजार कोटींच्या मुदतठेवी असताना कर्जरोखे उभारण्याची गरज का पडली? असा जाब सदस्यांनी विचारला. तसेच पालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी लावून धरली.

समाजवादी पक्षाचे आमदार व गटनेते रईस शेख यांनी याविषयावर हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. कर्जरोखे उभारण्याची काय पद्धत आहे? प्रशासनाने कोणाशी चर्चा केली? याबाबत खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली. पालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. या मागणीचे सर्वपक्षीय सदस्यांनी समर्थन केले. पुढील दोन वर्षांत महापालिकेची आर्थिक वाटचाल कशी असणार? याची माहिती देण्यासाठी महापौरांनी गटनेत्यांची बैठक बोलावणे अपेक्षित होते, अशी नाराजी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केली.

महापैरांवर निशाणा...

महापालिका कर्जरोखे उभारणार असल्याचे माहीत असताना महापौरांनी गटनेत्यांना विश्वासात घेतले नाही, असा आक्षेप काँग्रेस, भाजप पक्षाच्या सदस्यांनी व्यक्त केला. चार महिन्यांत महापौरांनी गटनेत्यांची केवळ एक बैठक घेतली. महापालिकेच्या प्रमुख महापौर असल्याने आम्ही त्यांनाच जाब विचारणार, असे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी ठणकावले. विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने अखेर महापौरांना आपण याबाबत विचारू, असे समजावत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी विरोधकांना शांत केले. तसेच या विषयावर प्रशासनाकडून स्पष्टीकरण येईपर्यंत हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात आला.

* मालमत्ता करातून अपेक्षित ६७६८ कोटींपैकी ७३४ कोटी रुपये तर विकास करातून ३८७९ कोटींपैकी ७०८ कोटी रुपये वसूल झाले आहेत, असे रवी राजा यांनी निदर्शनास आणले.