अलिबाग : हवामान खात्याकडून मिळणारा अतिवृष्टी आणि चक्रीवादळाच्या सतर्कतेचा पूर्व इशारा एका एसएमएसच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख घटकांना त्यांच्या मोबाइलवर मिळत आहे. रायगडच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने विविध घटकांचे १५ ग्रुप केले असून त्यांची सदस्य संख्या आता सुमारे साडेतीन हजार झाली आहे. ही सेवा सीडॅक आणि एनआयसीच्या माध्यमातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला पुरविली जात आहे. या सेवेमुळे आपत्तीवर उपाययोजना करण्यास चांगलीच मदत मिळणार आहे.जिल्ह्यात २००५ साली अतिवृष्टीने थैमान घालत ठिकठिकाणी आपत्ती कोसळली होती. त्यावेळी नेमके काय करायचे याची तयारी झाली नसल्याने आपत्तीचा सामना करताना बऱ्याच कठीण प्रसंगांना जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारला सामोरे जावे लागले होते. येणाऱ्या अतिवृष्टीची पूर्वकल्पना मिळाली असती, त्यावर तातडीने उपाययोजना करणे सोपे झाले असते. अतिवृष्टी आणि चक्रीवादळाची माहिती काही काळ आधी जिल्ह्यातील सक्षम यंत्रणांना कळविण्याचे नियोजन केले. यासाठी मोबाइल नंबरवर अतिवृष्टी आणि चक्रीवादळाची माहिती पाठविण्याची व्यवस्था केली. रायगड जिल्ह्यात ही सेवा मॅग्नम आॅप्स या खाजगी संस्थेच्या माध्यमातून २०१२ साली मिळण्यास सुरुवात झाली होती. एक लाख व्यक्तींना एसएमएस पाठविण्यासाठी ही संस्था सुमारे १० हजार रुपये आकारत होती. आता मात्र सरकारची सीडॅक आणि एनआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा विनामूल्य पुरविली जाणार आहे. १५ ग्रुपमध्ये साडेतीन हजार व्यक्तींचे मोबाइल नंबर फिड असल्याने आपत्ती प्रसंगी मदत मिळणार आहे. (प्रतिनिधी)जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या संगणकावर १५ ग्रुप निर्माण केले असून त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, खाते प्रमुख, पोलीस, मीडिया, जिल्हाधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद विभाग प्रमुख, मस्त्य व्यवसाय, सोसायट्या, सरपंच, मंडळ अधिकारी, आशा कार्यकर्त्या यांचा समावेश करण्यात आला असून, शिक्षक आणि विविध शैक्षणिक संस्थांचाही यामध्ये समावेश करण्याची प्रक्रिया सुरुच आहे.- सागर पाठक, अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
मोबाइलवर मिळतोय वादळाच्या सतर्कतेचा इशारा
By admin | Updated: June 15, 2015 22:43 IST