Join us  

आजपासून दहावीची परीक्षा, केंद्रावर वेळेत पोहोचा अन्यथा परीक्षेला मुकावे लागू शकते

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2018 9:16 AM

बारावीच्या परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेसाठीही विद्यार्थ्यांना सकाळी साडे दहा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणं बंधनकारक आहे

मुंबई  - शैक्षणिक वर्षातील अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जाणारी दहावाची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. मुंबईतून तब्बल 3 लाख 82 हजार 544 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होणार असल्याची माहिती मंडळाने दिली आहे. 1 मार्च ते 24 मार्च दरम्यान ही परीक्षा पार पडणार आहे. बारावीच्या परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेसाठीही विद्यार्थ्यांना सकाळी साडे दहा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणं बंधनकारक आहे. नव्या नियमानुसार परीक्षा केंद्रावर उशिरा पोहचणा-या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेआधी केंद्रावर पोहोचण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. प्रश्नपत्रिकेचे वाचन व आकलन होण्यासाठी पूर्वनियोजित वेळेपूर्वी १० मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. 

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत येत्या १ मार्च ते २४ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे. १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी परीक्षेस नोंदणी केली असून त्यात ९ लाख ७३ हजार १३४ मुले व ७ लाख ७८ हजार २१९ मुली आहेत. राज्यातील २१ हजार ९८६ माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यात नियमित विद्यार्थी १६ लाख ३७ हजार ७८३ असून तर ६७ हजार ५६३ पुनर्परीक्षार्थी व ४६ हजार ७ इतर विद्यार्थी आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यावेळी उपस्थित होते.

यंदा पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेतली जाणार असून परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी सर्व विभागीय मंडळाने जिल्हानिहाय एका समुपदेशकाची नियुक्ती केली आहे. तसेच २५२ भरारी पथके नेमण्यात आल्याचेही काळे यांनी सांगितले.

हेल्पलाईन क्रमांक-पुणे -९४२३०४२६२७, (०२०) ६५२९२३१७, नागपूर -(०७१२)२५६५४०३, २५५३४०१, २५६०२०९, औरंगाबाद -(०२४०)२३३४२२८, २३३४२८४, मुंबई -(०२२) २७८८१०७५, २७८९३७५६, कोल्हापूर -(०२३१) २६९६१०१, १०२, १०३, अमरावती- (०७२१) २६६२६०८, नाशिक (०२५३) २५९२१४३, लातूर -(०२३८२) २५८२४१, २५९२५८ , कोकण -(०२३५२) २२८४८०. तसेच राज्य मंडळ स्तरवरील हेल्पलाईनचे दूरध्वनी क्रमांक - (०२०)२५७०५२७१,७२.विभागीय मंडळ निहाय विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे : पुणे : २,८६,११५ नागपूर : १,८३,१६८, औरंगाबाद : १,९७,४३६, मुंबई : ३,८२,५४४ , कोल्हापूर : १,५०,३७५, अमरावती : १, ८३, ६८१, नाशिक : २, १०, ७१४, लातूर : १,१८,३३१ , कोकण : ३८,९८९