उरण : उरणच्या तहसील कार्यालयाने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत सर्व शासकीय अधिकाऱ्यांना पावसाळ्यपूर्वी उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे समुद्रातील उधाणाचे पाणी नवघर गावात शिरल्याने आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले असून नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.तालुक्यात कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक संकट ओढवू नये, यासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी उरणचे नायब तहसीलदार रवी पाटील यांनी उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय अधिकारी, सरपंच, लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी नायब तहसीलदार रवी पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात मार्गदर्शन केले होते. यावेळी नवघर गावातील नाल्यात साचलेल्या गाळ, केरकचरा, प्लास्टिकच्या पिशव्या न काढल्याने उधाणाचे पाणी नाल्याद्वारे रहिवाशांच्या घरात शिरत असल्याचे आढळले. (वार्ताहर)नवघर गावातील नालेसफाई करण्यात आली आहे. नाल्यातील गाळ काढण्यात आला आहे. तरीही गावात उधाणाचे पाणी शिरल्याने त्याची पाहणी करण्यासाठी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.- पी.एम. शिवतकर, सिडको अधिकारी
उधाणाचे पाणी नवघर गावात
By admin | Updated: June 6, 2015 22:39 IST