मुंबई : मुलीच्या मृत्यूला सहा महिने उलटूनही न्याय मिळत नसल्याने न्यायासाठी गायकवाड कुटुंबियांची वणवण सुरु आहे. आईच्या पाठपुराव्यामुळे पोलिसांनी मृत्यूच्या तीन महिन्यानंतर प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करुन हात वर केले. आता त्यालाही तीन महिने उलटले. मात्र आरोपी अजूनही मोकाट असल्याने आपल्याला न्याय मिळणार का? असा सवाल गायकवाड कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. अंबरनाथ येथील गोसावी सोसायटीत राहणाऱ्या शशिकला गायकवाड (४५) मुलगी दिपलक्ष्मी आणि मुलगा अनिकेत सोबत राहतात. पतीच्या निधनानंतर मुलाच्या तुटपुंज्या पगारावर त्यांच्या कुटुंबांचा उदनिर्वाह होत आहे. शशिकला यांनी ’लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत असलेल्या दिपलक्ष्मीचे त्याच परिसरात राहत असलेल्या अश्मित दाससोबत प्रेमसंबंध होते. मात्र दासच्या कुटुंबियांनी दोघांच्या लग्नाला नकार दिला. त्यामुळे अश्मितनेही दिपलक्ष्मीला टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ती तणावाखाली होती. २५ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मैत्रीणीला भेटायला जाते असे सांगून ती घराबाहेर पडली ती कायमचीच. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. तिचा संपर्कही तुटला. गायकवाड कुटुंबियांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मिसिंगची तक्रारीची नोंद करत तपास सुरु केला. अशात दोन दिवसानंतर तिचा मृतदेह कल्याण रेल्वे रुळावर सापडल्याची माहिती तिच्या कुटुंबियांना मिळाली.कुटुंबियांनी यामागे अश्मित असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला. अश्मितमुळेच तिने आत्महत्या केल्याचा आरोप शशिकला यांनी केला. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शशिकला यांनी शासन दरबारी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे पोलिसांनी हा तपास शिवाजी नगर पोलिसांकडे वर्ग केला. तीन महिन्यानंतर २१ जून रोजी शिवाजी नगर पोलिसांनी अश्मितला दिपलक्ष्मीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरवित त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होऊनही तीन महिने उलटले. मात्र अद्याप आरोपी मोकाटच असल्याने गायकवाड कुटूंबियांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी शशिकला यांनी लढा उभारला आहे. मुलीच्या मत्यूनंतर शशिकला या मुलासोबत सायन येथे त्याच्या हॉस्टेलमध्ये राहत आहे. न्याय न मिळाल्यास शशिकला यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे. - आरोपीने अटक पूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तपास अधिकारी जी. पाटील यांनी दिली. - ’रेल्वे पोलिसांकडून तपास आमच्याकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर चौकशी नंतर आम्ही गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीच्या अटकेबाबत पाठपुरावा सुरु आहे. त्याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक दिलीप गोडबोले यांनी दिली.
सहा महिने उलटूनही आरोपी मोकाट
By admin | Updated: September 27, 2016 03:00 IST