नवी मुंबई : साडेबारा टक्के भूखंड वाटप योजनेंतर्गत आतापर्यंत ९१.३५ टक्के भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेली या योजनेतील उर्वरित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सिडकोने कंबर कसली आहे. मागील वर्षभरात या योजनेंतर्गत जवळपास १५ हेक्टर भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. साडेबारा टक्के योजनेंतर्गत ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यांत एकूण ३७,८९२ खातेदार आहेत. त्यापैकी ३१,४६८ खातेदारांना भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित प्रकरणे वारस दाखला नसणे, अतिक्रमण अहवाल व इतर कारणांमुळे प्रलंबित राहिली आहेत. विशेष म्हणजे ८५ टक्के प्रकरणे वारस दाखल्याअभावी प्रलंबित राहिल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या जवळपास २७५ प्रकरणांचे वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकरणांची पात्रता मंजूर करून जनतेच्या हरकती समजून घेण्यासाठी त्यांची यादी वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी ५ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीच्या आत हरकती प्राप्त न झाल्यास सदर यादी अंतिम समजून भूखंड वाटपाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, गेल्या वर्षभरात साडेबारा टक्क्यांच्या २८०० संचिकांचा निपटारा करण्यात आला आहे. तर २३५ भूखंडांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले आहे. यात पनवेल आणि उरण तालुक्यांतील प्रकरणांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
साडेबारा टक्के भूखंड वाटपाला गती
By admin | Updated: June 17, 2015 00:11 IST