जामखेड/खर्डा : राज्यात दलितांवर वाढत असलेले अन्याय व मागासवर्गीयांवरील हल्ल्यांना आळा घालण्यासाठी व दलित अत्याचाराचे प्रलंबित खटले त्वरित निकाली काढण्यासाठी राज्यातील प्रत्येक विभागात एक असे सहा विशेष न्यायालये स्थापन करण्याची घोषणा गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केली.खर्डा येथील दलित युवक नितीन आगे याच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री पाटील यांनी संबंधित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. तत्पूर्वी मयत नितीनच्या आई-वडिलांशी बंद खोलीत पंधरा मिनिटे चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. पत्रकारांशी बोलताना गृहमंत्री म्हणाले की, दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी जिल्हास्तरीय अत्याचार प्रतिबंध सेल सक्षम करून चांगली यंत्रणा उभी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांना दिले आहेत. आचारसंहितेनंतर ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यांसाठी जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेऊ.आगे हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी लवकरच ॲड. उज्ज्वल निकम यांची शासनाच्या वतीने नियुक्ती करून जलदगती न्यायालयात खटला चालवला जाईल. दलितांवरील वाढत असलेले अत्याचार नाकारून चालणार नाही. प्रत्येक गावात जातीय तणाव होणार नाही. यासाठी राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही आऱ आऱ पाटील म्हणाले़यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनशाम शेलार, तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, मा.पं.सदस्य विजयसिंह गोलेकर, सरपंच शिवकन्या इंगळे, उपसरपंच मदन गोलेकर, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, कल्याण गोलेकर, सावता लोखंडे आदी उपस्थित होते.----------------------------गावात एकही ॲट्रॉसिटीचा गुन्हा नाहीगृहमंत्री पाटील यांनी आगे कुटुंबियांशी बंद खोलीत चर्चा केली. त्यांच्यासमवेत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवेसह निवडक नातेवाईक होते. बंद खोलीत चर्चा झाल्यानंतर सर्वांची एकत्र घरासमोर बसून चर्चा करण्यात आली. नितीनच्या आई-वडील व ग्रामस्थांनी गावात कुठलाही जातीय तंटा नाही याची कबुली गृहमंत्र्यांना दिली. विशेष म्हणजे गावात गत दहा वर्षात एकही ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल नाही. गावात जातीय सलोखा असल्याची ग्रामस्थांसह खर्डा गावच्या सरपंच शिवकन्या इंगळे यांनी गृहमंत्र्यांना माहिती दिली.-----शिवजयंती-आंबेडकर जयंती एकत्रउत्तरीय अहवालानुसार गळा दाबून मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शिंदे यांनी गृहमंत्र्यांना दिली. मुलाने याआधी घरी तक्रार केली होती का? पोलीस तपासात सहकार्य होतेय का? गुन्हेगारांकडून अथवा ग्रामस्थांकडून काही त्रास होतोय का? तपासात काही त्रुटी जाणवतात का? पक्षीय राजकारणाचा काही त्रास जाणवतो का? आदी गोष्टींची विचारणा गृहमंत्री पाटील यांनी संबंधीत कुटुंबीयांना केली. गावकरी शिवजयंती, आंबेडकर जयंती व अण्णाभाऊ साठे यांची जयंती एकत्र साजरी करतात. याबाबत गृहमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले़ आगे कुटुंबास मुख्यमंत्री निधीचे ५ लाख, राष्ट्रवादीने जाहीर केलेले ५ लाख तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल, असे ते म्हणाले़
दलितांवरील खटल्यासाठी विशेष न्यायालये
By admin | Updated: May 7, 2014 02:34 IST