मुंबई : अतिक्रमणांमुळे रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी या प्रकल्पाच्या आड येणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांना सामावून घेणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांना पालिकेकडून चार एफएसआय देण्याची शिफारस विकास नियोजन आराखड्यात करण्यात आली आहे़ त्यामुळे मुख्य रस्ते वाहतूककोंडीतून सुटतील, असाही दावा पालिका प्रशासन करीत आहे़अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम झाल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत़ काही ठिकाणी रस्त्यांवर अतिक्रमणे झाली आहेत़ अनेक ठिकाणी रस्त्यांची जागा जुन्या इमारतींमध्ये गेली आहे़ त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होत आहे़ रस्ते रुंदीकरण प्रकल्पात बाधा ठरणाऱ्या इमारत हटविण्यास रहिवाशांचा विरोध आहे़ त्यामुळे वाहतुकीची समस्या कायम आहे़यावर तोडगा म्हणून विकासकांना जास्तीत जास्त चार एफएसआय मंजूर करण्याची तरतूद विकास आराखड्यात करण्यात आली आहे़ रस्ता रुंदीकरणामुळे विस्थापित होणारे रहिवासी लांबच्या भागात दिलेल्या पर्यायी घरात जात नाहीत़ त्यामुळे रस्त्यालगत उभारल्या जाणाऱ्या इमारतीतच या रहिवाशांना घरे दिली जाणार आहेत़ यासाठी बिल्डरला अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक दिला जाणार आहे, असे पालिका आयुक्त अजय मेहता यांनी स्पष्ट केले आहे़ (प्रतिनिधी)
प्रकल्पबाधितांना दिलासा
By admin | Updated: May 15, 2016 04:17 IST