Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आतापर्यंत १९ हजार ४०६ पक्ष्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांतील स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळून आला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रामध्ये ८ जानेवारीपासून आजपर्यंत एकूण १९ हजार ४०६ विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

कुक्कुट आणि बदक पक्ष्यांमधील नमुने होकारार्थी आल्यास या क्षेत्रास नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून, बर्ड फ्लूसाठी होकारार्थी आढळून आलेल्या पोल्ट्री फार्मपासून १ किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येते. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून ७१ हजार ७७३ कुक्कुट पक्षी, ४४ हजार १६ अंडी व ६३ हजार २३४ किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहे.

२७ जानेवारीच्या अहवालानुसार यवतमाळ जिल्ह्यातील खंडाला येथील एक मोर आणि नांदेड जिल्ह्यातील हंगरगा येथील एक घुबड यांचे बर्ड फ्लूसाठी होकारार्थी अहवाल प्राप्त झाले आहेत. दरम्यान, नुकसानभरपाईअंतर्गत ज्या पक्षी मालकांचे पक्षी जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आले आहेत त्यांना २७.५२ लक्ष अनुदान वाटप करण्यात आले आहे.

* २८ जानेवारी रोजी मृत पक्षी

- कुक्कुट पक्षी

जळगाव ५, अहमदनगर १०२, लातूर १५, उस्मानाबाद ६, अमरावती १४, एकूण १४२

- बगळे, पोपट, चिमण्या

ठाणे १०, रत्नागिरी १, एकूण ११

- कावळे

मुंबई ६, ठाणे ९, एकूण १५

(मृत पक्ष्यांचा चाचणी अहवाल येणे बाकी.)

.......................................