Join us

चिंचणीकर पाण्यासाठी उतरणार रस्त्यावर

By admin | Updated: June 9, 2014 00:15 IST

तालुक्यात आर्थिकरित्या सक्षम असलेल्या व लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात मोठ्या असलेल्या चिंचणी ग्रामपंचायतीचा मात्र निष्काळजीपणाच समोर येत आहे

डहाणू : तालुक्यात आर्थिकरित्या सक्षम असलेल्या व लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात मोठ्या असलेल्या चिंचणी ग्रामपंचायतीचा मात्र निष्काळजीपणाच समोर येत आहे. येथील भाटीपाडा (रिफाईनगर) च्या हजारो ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी डोळ्यात पाणी आणून झगडावे लागत आहे.गेल्या दहा वर्षापासून या पाड्यावर रस्ते, गटार, सार्वजनिक शौचालय, अंगणवाडी या सोयीसुविधा अद्यापही न पुरविल्याने नागरिकांत कमालीचा प्रक्षोभ निर्माण झाला असून येत्या आठ दिवसांत पिण्याच्या पाण्याची सोय न झाल्यास प्रचंड मोठा मोर्चा काढण्याचा इशारा काँगेस कार्यकर्ते सईद शेख यांनी ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती (डहाणू) ला दिला आहे.डहाणूतील चिंचणी ग्रामपंचायत प्रशासन तसेच सत्ताधारी पक्षाच्या मनमानी कारभारामुळे येथील अनेक प्रभागांत पुरेशा प्रमाणात सोयीसुविधांचा अभाव असल्याने येथील नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रामाणिकपणे मालमत्ताकर, पाणीपट्टी तसेच दिवाबत्तीकर भरूनही ग्रामस्थांना नेहमीच अशा नागरी समस्यांचा सामना करावा लागत असल्याने हजारो नागरीक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेचिंचणी गावाच्या पुर्व भागात वसलेल्या भाटीपाडा (रिफाई नगरी) येथील नागरीकांना गेल्या पाच वर्षापासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने याबाबत ग्रा. पं. कडे वारंवार मागणी करूनही तिथे नवीन जलवाहिनी टाकली जात नसल्याने येथील महिलांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. येथील शेवटच्या टोकावर पाणी जात नसल्याने महिलांना सागरी महामार्ग ओलांडून पाणी घेऊन जाण्याची वेळ आली आहे. शिवाय या पाड्यावर गेल्या दहा वर्षात रस्ते, गटार, सार्वज्निक शौचालय, अंगणवाडी, कचराकुंडीची सोय केली जात नसल्याने येथील बहुसंख्य रहिवाशांनी घरे विकून स्थलांतर केले आहे.येथील सागरी महामार्गावरील पथदिवे गेल्या सहा महिन्यापासून बंद आहेत. ग्रा. पं. प्रशासनाकडे तक्रार करूनही या परिसरातील समस्यांकडे कुणीही गांभीर्याने पाहत नसल्याने येथील हजारो रहिवाशांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित तसेच गट विकास अधिकारी रमेश अवचार यांना भेटून निवेदन सादर केले आहे. (वार्ताहर)