बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगर परिषद क्षेत्रात २०१० ते २०१३ या कार्यकाळात झालेल्या टीडीआर (विकास हस्तांतरण हक्क) घोटाळ्यात अडकलेल्या पाच अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कल्याण सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे या घोटाळ्याच्या काळात जे नगराध्यक्ष होते, त्यांचा अहवाल पालिकेकडून मागविण्यात आला आहे.या प्रकरणात राज्य सरकारच्या आदेशानुसार ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. २०१० ते २०१३ या कालखंडात आरक्षणे विकसित करण्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा ठपका राज्य सरकारनेच ठेवला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल झाली आहे. या प्रकरणातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१० ते २०१३ या कार्यकाळातबदलापूर पालिकेत चार नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारले आहेत. त्यात राम पातकर, राजन घोरपडे, वामन म्हात्रे आणि जयश्री भोईर यांचा समावेश आहे. टीडीआर घोटाळ्यात या नगराध्यक्षांचा कशा प्रकारे सहभाग आहे, याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने मागविली आहे. टीडीआर प्रकरणातील कागदपत्रांवर कोणाच्या स्वाक्षरी आहेत, याची चाचपणी सुरू आहे. या प्रकरणात अडकलेल्या तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी आणि चार अभियंत्यांनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण सत्र न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाने या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे हे आरोपी उच्च न्यायालयात दाद मागतात की अटकेला सामोरे जातात, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (प्रतिनिधी)
टीडीआर घोटाळ्यातील आरोपींच्या अटकेची चिन्हे
By admin | Updated: August 27, 2015 02:33 IST