ठाणे : भिवंडीजवळील विश्वभारती फाटा ते नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या वडपे बायपास रस्त्यासाठी भूसंपादनाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा रस्ता मार्चपर्यंत पूर्ण होण्याचे संकेत बांधकाम विभागाने दिले आहेत.भिवंडीजवळील वाहतूककोंडीतून सुटका करून घेण्यासाठी वडपे बायपास रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे. वन विभागातून जाणाऱ्या या रस्त्याला काही काळ विरोध करणाऱ्या वन खात्याने या रस्त्याच्या कामास मंजुरी दिली आहे. यामुळे या रस्त्याच्या कामाचा मोठा अडथळा आता दूर झाला आहे. बाह्यवळणाचा हा सुमारे ७ किमीचा नवीन रस्ता मार्च २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे त्यासाठी भूसंपादनाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या बायपास रस्त्याच्या लांबीमध्ये वनजमिनीचा समावेश येत असल्यामुळे वन विभागाने त्यासाठी अडथळा निर्माण केला होता. पण, वन खात्याच्या अटी व शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे. यामुळे या रस्त्याच्या भूसंपादनासह हा रस्ता वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लवकरच पूर्ण करण्याचा दावा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
वडपे बायपास रस्ता मार्चपर्यंत पूर्ण होण्याचे संकेत
By admin | Updated: December 7, 2014 23:39 IST