अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवलीआसनगाव स्थानकात उतरल्यानंतर अथवा येतांना बहुतांश प्रवासी व विद्यार्थी थेट रेल्वे रुळांमधून स्वत:चा जीव धोक्यात घालून अपेक्षित ठिकाणी जाण्यासाठी शॉर्टकटचा अवलंब वर्षानुवर्षे करीत आहेत. मंगळवारच्या अपघातानंतरही सुरक्षा यंत्रणा जागी झाली नाही. या सर्व परिस्थितीकडे स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेचे दुर्लक्ष होत आहे. सकाळच्या वेळेत व संध्याकाळी महाविद्यालय भरतांना व सुटतांना या वेळेत विशेषत: हे रोज घडते.मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील आसनगाव रेल्वे स्थानकाच्या परिसरात अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच अन्य विविध महाविद्यालये आहेत. त्यामुळे या ठिकाणी मुंबईसह उपनगरातील अनेक महाविद्यालयीन हजारो विद्यार्थी उच्च शिक्षणसाठी येथे उपनगरीय लोकलच्या माध्यामातून ये-जा करतात. या सर्व कालावधीत या मार्गावरून ताशी १०० ते १२० कि मीच्या वेगाने अप-डाऊन दिशांवर गाड्या धावत असतात. अशातच जर या विद्यार्थ्यांना गाडीच्या वेगाचा अंदाज न आल्यास मोठा अपघात घडेल अशी धोक्याची सूचना कल्याण-कसारा रेल्वे पॅसे.असो.च्या पदाधिका-यांनी रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेला दिलेली आहे. तसेच त्यावर उपाययोजना म्हणून सकाळी-संध्याकाळी विशेषत्वाने सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात यावी, विद्यार्थ्याना आळा घालावा अशा मागणीचे निवेदनेही देण्यात आली आहेत. जनजागृती मोहीम कागदावरचया मार्गावर कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर्स असो. वेल्फे. ही प्रवासी संघटना कार्यरत असून या संघटनेच्या माध्यमातून उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या वतीनेही रेल्वेच्या वरिष्ठांचे याबाबत लक्ष वेधले होते. संघटनांनी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाविद्यालये आणि शाळा तसेच स्थानकात मोहीम राबविण्याचा संकल्प केला होता, मात्र तो सुरक्षा व्यवस्थेच्या असहकारामुळे कागदावरच राहीला असल्याचे संघटनेचे राजेश घनघाव यांनी सांगितले. या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी असाही प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र त्याकडेही दुर्लक्ष झाल्याचे सांगण्यात आले. उपनगरीय यात्री रेल उपभोक्ता समिती (डीआरयूसीसी)च्या बैठकीतही या संदर्भात सुरक्षा विभागाच्या आयुक्तांसह विभागीय व्यवस्थापकांकडे सूचना दिली होती, मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत कोणतीही प्रभावी उपाययोजना झालेली नसल्याचे जितेंद्र विशे यांनी सांगितले.