Join us  

महायुतीत न आल्यास शिवसेनेला फटका बसेल, आठवलेंच भाकित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 7:16 AM

आठवलेंचा मनोमिलनाचा सल्ला : सेना-भाजपाने कलगीतुरा थांबवावा

कल्याण : शिवसेना-भाजपाने आपापसातील कलगीतुरा थांबवावा. २०१४ च्या निवडणुकीप्रमाणे यंदाही शिवसेनेने महायुतीसोबत यावे. कुरघोडीचे राजकारण सुरूच राहिले तर त्याचा फटका शिवसेनेलाच बसेल, असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी येथे व्यक्त केले.

एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी आठवले कल्याणमध्ये आले होते. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी पाच राज्यांचे निवडणूक निकाल, राफेल करार आणि विरोधकांची मानसिकता, तसेच अंबरनाथमध्ये त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर भाष्य केले. तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाला; मोदींचा नाही. त्या राज्यांमध्ये १० ते १५ वर्षे भाजपाची सत्ता होती. तेथील जनतेला बदल हवा होता, तो त्यांनी केला. काँग्रेसने या यशाने हुरळून जाऊ नये, असा सल्ला आठवलेंनी दिला. राफेल प्रकरणात सरकारने न्यायालयाची दिशाभूल केल्याचा चुकीचा संदेश पसरवला जात आहे. त्याचा कोणताही फायदा त्यांना आगामी निवडणुकीत होणार नाही. अन्य कोणतेही विषय नसल्याने राफेलचा अपप्रचार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्ष मनाने एकत्र नाहीत. केवळ शपथविधी कार्यक्रमांपुरतेच ते एकत्र दिसतात. राहुल गांधींना त्यांचा पाठिंबा नाही.

सध्याचे सरकार हे उद्योगपतींचे सरकार असल्याच्या आरोपावर आठवले म्हणाले की, भाजपा बहुजनांचा पक्ष आहे. उद्योगधंदे वाढले तरच तरुणांना रोजगार मिळेल. त्यामुळे भाजपा सरकार उद्योगांना पाठिंबा देणारे आहे, उद्योगपतींना नाही, असे ते म्हणाले. रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.मीच करणार मनोमिलनकोस्टल रोड भूमिपूजन कार्यक्रमात शिवसेनेने भाजपाला डावलले तर कल्याणच्या मेट्रोच्या कार्यक्रमात सेनेला आमंत्रण नसल्याच्या मुद्द्यावर आठवलेंनी आपल्या खास शैलीत कविता पेश केली. सेना आणि भाजपाच्या मनामध्ये आहे जलन, मात्र आपणच करणार त्यांचे मनोमिलन असे त्यांनी म्हणताच हशा पिकला.

टॅग्स :रामदास आठवलेशिवसेना