Join us  

“गोविंदाला पक्षात घेताना भाजपाला नक्की विचारलेय ना?”; ठाकरे गटाचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 8:02 AM

Shiv Sena Thackeray Group News: गोविंदाने लोकसभा निवडणुकीसाठी दाऊदची मदत घेतली होती, असा आरोप राम नाईकांनी केला होता. याची आठवण करून देत ठाकरे गटाने शिंदे गटावर टीका केली.

Shiv Sena Thackeray Group News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाने ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, महायुतीत काही जागांवरून अद्यापही चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यातच बॉलिवूड अभिनेता गोविंदा याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. गोविंदाच्या शिंदे गटातील प्रवेशावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली असून, गोविंदाला पक्षात घेताना भाजपाला विचारले आहे ना, असा सवाल ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. 

ठाकरे गटाने अधिकृत एक्स अकाऊंटवरून यासंदर्भात काही पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये भाजपाचे माजी खासदार राम नाईक यांनी गोविंदावर केलेल्या आरोपाचा उल्लेख करण्यात आला आहे. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत गोविंदाने भाजपा नेते राम नाईक यांचा पराभव केला होता. यानंतर उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना राम नाईक यांनी प्रकाशित केलेल्या आत्मचरित्रात गोविंदाने लोकसभा निवडणुकीसाठी दाऊदची मदत घेतली होती, असा मोठा आरोप करण्यात आला होता. हाच धागा पकडत ठाकरे गटाने गोविंदाच्या पक्षप्रवेशावरून शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 

गोविंदाला पक्षात घेताना भाजपाला नक्की विचारलेय ना?

ज्या गोविंदावर भाजपने 'दाऊदची मदत' घेतल्याचे आरोप केले, त्या गोविंदाला पक्षात घेताना भाजपला नक्की विचारलंय ना?, अशी विचारणा ठाकरे गटाने एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये केली आहे. या पोस्टमध्ये राम नाईक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होतानाचा फोटो आणि राम नाईक यांनी केलेले आरोप यांचा उल्लेख करण्यात आला आहे. तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये मीडियाने याबाबत केलेल्या कव्हरेजचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

दरम्यान, उत्तर पश्चिम मुंबईतून गोविंदाला लोकसभेची उमेदवारी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे दावे फेटाळून लावले. गोविंदा पक्षासाठी स्टार प्रचारक म्हणून काम करतील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :गोविंदाशिवसेनाराजकारणमुंबई