ठाणे : बेपत्ता गिर्यारोहकाच्या मृतदेहाचा शोध घेत असतांनाच ठाणे ग्रामीण पोलिसांच्या श्वान पथकातील शहीद झालेल्या कॅटरीनाच्या पार्थीवावर पोलिसांच्या आठ गार्डकडून २४ फैरींची सलामी देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कॅटरीनाला तिच्या ट्रेनर व हॅन्डलरसह पोलिसांनी साश्रू नयनांनी निरोप दिला.भिवंडीच्या मोहिली गावातील जुगाडगाव किल्याजवळील उंबराचे पाणी डोंगरावर नारायण चौधरी हे १८ आॅक्टोंबर २०१४ रोजी गिर्यारोहणासाठी गेले होते. ट्रॅकिंग करतांना त्यांचा पाय सटकल्यानंतर ते १९ आॅक्टोंबर रोजी सकाळी खोल दरीत कोसळले होते. गिरीमित्र प्रतिष्ठानच्या गिर्यारोहकांचा चमू त्यांचा शोध घेत असतांनाच ठाण्याहून पोलिसांच्या श्वानपथकातील कॅटरीनालाही या मोहीमेसाठी आणण्यात आले होते. डोंगराचा तीव्र चढ, शरीरातील वाढती उष्णता आणि दुपारच्या उष्म्याचा त्रास झाल्याने तिला चक्कर आली. त्यातच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करण्यात आले. बुधवारी सकाळी तिचे पार्थिव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दुपारी २ वा. च्या सुमारास ठाणे ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत कदम, मुख्यालयाचे राखीव पोलिस निरीक्षक अशोक येरुणकर, वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर, निरीक्षक सुलभा पाटील, श्वानपथकाचे उपनिरीक्षक चंद्रकांत बनकर, कॅटरीनाचे फर्स्ट हॅन्डलर मनोज सोनवणे, सेकंन्ड हॅन्डलर दुष्यंत कांबळे यांच्यासह मुख्यालयाच्या आठ गार्डनी प्रत्येकी तीन अशा २४ फैरींची सलामी दिली. त्यानंतर तिचे पार्थीव वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या आवारात दफन करण्यात आले. या वेळी श्वानपथकाचे सोनवणे आणि कांबळे या कर्मचाऱ्यांनाही आश्रू आवरता आले नाही. (प्रतिनिधी)
साश्रू नयनांनी कॅटरीनाला दिला निरोप
By admin | Updated: October 22, 2014 23:15 IST