मनोहर कुंभेजकर, मुंबई - मत्स्यसंवर्धनाचा भविष्याचा विचार करत महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत १५ मे ते १५ आॅगस्टपर्यंत मासेमारी बंदीसाठी ठाणे जिल्हा सज्ज झाला आहे. गुरुवारपासून ठाणे जिल्यातील सातपाटी, डहाणू, धाकटी डहाणू, अर्नाळा, वसई, उत्तन येथील सुमारे ४ हजार मच्छीमार नौका शाकारण्यासाठी धक्क्याला लागणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे चिटणीस रामकृष्ण तांडेल यांनी दिली. फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आणि गुजरातमधील मच्छीमारांची या मत्स्यबंदी कालावधीसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक झाली होती. मत्स्यसंवधर्नाचा विचार करून ७ मे पासून मासेमारी बंदीची हाक गुजरातच्या मच्छीमारांनी दिली होती. मात्र या बैठकीत १५ मे ते १५ आॅगस्ट या कालवधीत मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती समितीचे मुंबई अध्यक्ष किरण कोळी यांनी दिली. गेल्या १५ ते २० दिवसांपासून समितीचे सरचिटणीस नरेंद पाटील, समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मेहेर यांच्यासह समितीच्या पदाधिकारी यांनी ठाणे जिल्ह्यातील मच्छीमार गावे पिंजून काढून मत्स्यसंवर्धनासाठी १५ मे ते १५ आॅगस्ट (नारळी पौर्णिमा) या काळात मासेमारी पूर्ण बंद ठेवावी; या केलेल्या आवाहनाला ठाणे जिल्ह्यातील मच्छीमारांनी पाठिंबा दिला आहे. या कालावधीत येथील मासेमारी बंद राहणार आहे, असे तांडेल यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्याचे अनुकरण मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि कोकणातील सर्व मच्छीमारांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरवर्षी शासनाच्या मत्स्यव्यवसाय खात्याच्या आदेशाप्रमाणे राज्यात १० जून ते १५ आॅगस्ट (नारळी पौर्णिमा) असा मासेमारी बंदीचा कालावधी असताना यंदा १५ मे पासून मासेमारी बंदीची हाक समितीने कशी दिली, असे विचारले असता समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी सांगितले की, सध्या मोठ्या प्रमाणावर मासेमारी सुरु असल्याने जर असेच चालू राहिले तर २०४७ साली समुद्रातील मत्स्यसाठा संपुष्टात येईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
नौका धक्क्याला!
By admin | Updated: May 15, 2014 06:04 IST