ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - राज्यात स्थिर सरकार यावे, पुन्हा निवडणूक घ्यायला लागू नये या हेतूने राज्याच्या हितासाठी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार शक्य नव्हते, कोणतेही पर्याय जुळत नसल्याने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक घेण्यात आली , त्यावेळी ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीने सत्तेसाठी भाजापाला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. जनतेने भाजपाला मोठ्या संख्येने निवडून दिले. मात्र सत्ता स्थापनेसाठी त्यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे राज्यात कुणाचेही सरकार स्थापन झाले नाही तर राष्टरपती राजवट लागू होईल, हे टाळण्यासाठी व स्थिर सरकार स्थापन व्हावे, यासाठी आपण भाजपाला पाठिंबा दिला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या विचारधारेशी कोणतीही तडजोड करणार नाही, असे सांगत आपण सरकार बनवण्यात सहभागी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.