Join us  

पुन्हा मोदींचं सरकार आलं, तर ते फक्त 13 ते 15 दिवस टिकेल; शरद पवारांचं भाकित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 7:09 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एबीपी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे.

मुंबईः मोदींचं सरकार फक्त 13 दिवस टिकेल, असं पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एबीपी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रपतींनी मोदींना सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं तरी त्या सरकारची अवस्था 1996मधल्या वाजपेयी सरकारसारखीच होईल, असंही पवारांनी सांगितलं आहे. मोदींचं हे सरकार फक्त 13 ते 15 दिवस टिकेल, असं भाकितही पवारांनी केलं आहे. भाजपाविरोधात सर्व पक्षांना एकत्र आणण्याचं काम सुरू आहे. 21 मे रोजी त्याला मूर्त स्वरूप येणार असल्याचंही पवार म्हणाले आहेत.पवार म्हणतात, आमच्या घरातले सगळेच निवडणुकीत सहभागी असतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जबाबदारी समजून घेऊन काम करते. मावळमध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव असल्यानं तिथल्या कार्यकर्ते आणि जनतेनं पार्थ पवारचं नाव सूचवलं. त्यामुळे त्याला उमेदवारी देण्यात आल्याचंही पवार यांनी सांगितलं आहे. यावेळी पवारांनी दुष्काळावरही मत प्रदर्शन केलं आहे. दुष्काळ दौरा ही विधानसभा निवडणुकीची तयारी नाही. प्रचारासाठी ग्रामीण भागात फिरताना पाहायला मिळालं की, जनतेला दुष्काळाला तोंड द्यावं लागतं आहे.

1972, 1978चा दुष्काळ मी पाहिला आहे. 1972मध्ये मी गृह राज्यमंत्री होतो. तर 1978मध्ये मी मुख्यमंत्री होतो. तेव्हा पाणी असूनही पीक गेलं होतं. पण आता लोकांना पाणी हवं आहे. धान्य आणि तेलाच्या किमती वाढणार असल्याचेही संकेत पवारांनी दिले आहेत. 

टॅग्स :शरद पवार