मुंबई : वानखेडे स्टेडियमवर आयपीएल सामन्यानंतर तेथील सुरक्षारक्षकांशी वाद घातल्याचे प्रकरण अभिनेता शाहरूख खानला चांगलेच भोवले आहे. हा प्रकार घडताना तेथे लहान मुले होती व शाहरूखचे वर्तन बालमनावर परिणाम करणारे होते. त्यामुळे याची चौकशी करून गुन्हा नोंदवण्याचे आदेश बालहक्क आयोगाने शुक्रवारी पोलिसांना दिले.आयोगाचे सचिव ए. एन. त्रिपाठी यांनी हे आदेश दिले. तसेच याचा गुन्हा घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करा, असेही आयोगाने आदेशात नमूद केले आहे.अमित मारू यांनी अॅड. वाय. पी. सिंग यांच्यामार्फत ही तक्रार केली. २०१२ मध्ये आयपीएल सामन्यानंतर शाहरूखचा वानखेडे स्टेडिअमवरील सुरक्षारक्षकाशी शाब्दिक चकमक उडाली होती. यामुळे शाहरूखला स्टेडियमवर प्रवेशबंदीही करण्यात आली. मात्र शाहरूखने त्या वेळी लहान मुलांसमोर गैरवर्तन केले होते. असे वर्तन बालमनावर परिणाम करणार असते. त्यामुळे शाहरूखविरोधात याची पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला नाही. तेव्हा आयोगाने आयपीसी व ज्युएनाईल जस्टीस अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मारू यांनी तक्रारीत केली आहे. त्यानुसार आयोगाने हे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
शाहरूखला मुलांसमोरील गैरवर्तन भोवले
By admin | Updated: March 21, 2015 01:56 IST