मुंबई : संकटकाळातही आपल्यासोबत राहते, ती आपली सावली, पण समजा, या सावलीनेही साथ सोडली तऱ़़? कल्पनाही करवत नाही ना! मात्र, असाच काहीसा अनुभव मुंबईकरांना १५ मे रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास येणार आहे. या दिवशी अगदी अर्ध्या मिनिटांसाठी मुंबईकरांची चक्क सावली साथ सोडणार आहे.वैज्ञानिक भाषेत या संकल्पनेला ‘झीरो शॅडो डे’ असे संबोधण्यात येते. राज्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या दिवशी नागरिकांना हा वैज्ञानिक अनुभव घेता येणार आहे. पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात, तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो, पण या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवयाला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो, तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते, जणू काही ती सावली गायब होते! याच घटनेला वैज्ञानिक भाषेत ‘झीरो शॅडो डे’ असे म्हणतात. (प्रतिनिधी)
सावलीही साथ सोडणार...
By admin | Updated: May 13, 2016 02:56 IST