मुंबई : मोबाइल बिलाची रक्कम भरूनही बिल भरण्यासाठी तगादा लावणाऱ्याला मोबाइल कंपनीला ग्राहकाची छळवणूक केल्याप्रकरणी सात हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश ग्राहक मंचने दिले.ग्राहकाचा काहीच दोष नसताना व्होडाफोन कंपनीने त्यांना मेसेज, ई-मेल्स आणि फोन करून सेवा खंडित करण्याची धमकी दिली. कंपनीने आऊटगोइंग कॉलची सुविधाही बंद केली. यावरून व्होडाफोननेच दोषपूर्ण सेवा पुरवली आणि सेवेत कसूर केल्याचे सिद्ध झाले आहे, असे मुंबई उपनगर जिल्हा तक्रार निवारण मंचने म्हटले. अंधेरीचे रहिवासी अशोक परब यांनी २०१३मध्ये ग्राहक मंचकडे तक्रार केली. बेस्ट बसेसमध्ये उपलब्ध असलेल्या चेक बॉक्समध्ये त्यांनी बिलाच्या रकमेचा चेक टाकला. तरीही १७ जानेवारी २०१२ रोजी त्यांना व्होडाफोन कंपनीकडून बिल पाठवण्यात आले. त्यावर परब यांनी बिलापोटी २६० रुपये चेकद्वारे भरल्याचे कंपनीला सांगितले. कंपनीने बँक स्टेटमेंटची स्कॅन कॉपी सादर करण्याचा आगह धरला. याद्वारे परब यांनी बिलाचे पैसे चेकद्वारे भरल्याचे सिद्ध झाले. परब यांना कंपनीकडून वारंवार येणाऱ्या कॉल्समुळे झालेल्या मानसिक त्रासापायी आणि बँकेतून कागदपत्रे आणण्यासाठी झालेल्या शारीरिक त्रासापोटी कंपनीस ग्राहक मंचने दंड ठोठावला.
मोबाइल कंपनीला सात हजार रुपयांचा दंड
By admin | Updated: October 4, 2015 04:05 IST